कल्याण पूर्वेतील रेल्वे स्कायवॉकवर एका दुचाकीस्वाराने थेट दुचाकी चढवली
दुचाकी थेट तिकीटघरापर्यंत नेली.
या प्रकारामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत
संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी
मुंबई आणि उपनगरच्या शहरांमध्ये ट्रॉफिकची समस्या कायम असते. वाढलेल्या वाहन संख्येमुळे पायी चालणाऱ्यांना वाट मिळत नाही. अनेकवेळा रस्ता ओलांडताना भरधाव जाणारी वाहनं पदचाऱ्यांना चिरडतात. त्यामुळे पायी चालणाऱ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी प्रशासनाने जागाजोगी स्कायवॉक उभारले आहेत.
जेणेकरून पायी जाणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही. पण कल्याण पूर्व परिसरात असा संतापजनक प्रकार घडल्याचं समोर आले आहे. दोन बहाद्दरांनी चक्क रेल्वे स्कायवॉकवर स्कूटी चालवली. यामुळे स्कायवॉक कोणासाठी आहे?अशी चाळे करणारे ही अती शहाणे कोण असे सवाल नागरिक करत आहेत.
कल्याण पूर्व परिसरातील रेल्वे स्कायवॉकवर एका दुचाकीस्वाराने थेट दुचाकी चढवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोळसेवाडी येथील स्कायवॉकवरून संबंधित दुचाकी थेट तिकीटघरापर्यंत आणण्यात आल्याची माहिती समोर आली असून या प्रकारामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
स्कायवॉक हे विशेषतः पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी उभारण्यात आलेले असतात. मात्र, अशा प्रकारे दुचाकी स्कायवॉकवर आणल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी मोठ्या प्रमाणात नागरिक या स्कायवॉकचा वापर करतात.अशावेळी एखादी दुचाकी अचानक आल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला असून संबंधित दुचाकीस्वारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्कायवॉकच्या प्रवेशद्वारांवर अधिक कडक नियंत्रण ठेवावे, अशा सूचनाही करण्यात येत आहेत. याबाबत रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने लक्ष घालून योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा, अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊन पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.