गोव्यात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाचा बागा बीचवर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आलीये. समुद्रकिनाऱ्यावरील खडकांवर बसून लाटांचा आनंद घेत असताना एका मोठ्या लाटेने त्याला समुद्रात खेचून नेलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ त्याच्या मैत्रिणीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.
मृत व्यक्तीचं नाव अश्पाक मसाली असं असून तो ३४ वर्षांचा होता. तो कर्नाटकातील विजापूरमध्ये राहणारा होता. तो आपल्या मैत्रिणीसोबत सुट्टी घालवण्यासाठी गोव्यात आला होता. ही महिला महाराष्ट्रातील सांगलीची असल्याची माहिती समोर आलीये.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी दिवसभर गोव्यातील प्रसिद्ध बागा बीचवर वेळ घालवला. यावेळी अश्पाकने दारूचं सेवन केलं होतं. त्यानंतर तो समुद्राच्या अधिक जवळ जाण्यासाठी किनाऱ्यावरील खडकांकडे गेला आणि तिथे बसून उसळणाऱ्या लाटांचा आनंद घेऊ लागला. यावेळी त्याच्या मैत्रिणीने मोबाईलमध्ये शूट केलेल्या व्हिडीओमध्ये अश्पाक खडकांवर बसलेला दिसतोय. त्याच्या अंगावर समुद्राच्या लाटा आदळत होत्या आणि तो त्याचा आनंद घेत होता. मात्र काही क्षणांतच एक मोठी लाट आली आणि त्याला थेट समुद्रात खेचून घेऊन गेली.
या घटनेनंतर त्याच्या मैत्रिणीने आणि आसपासच्या लोकांनी तातडीने मदतीसाठी आरडाओरडा केला. अश्पाक काही काळ पाण्यावर तरंगताना दिसला, मात्र समुद्र खवळलेला असल्याने त्याला स्वतःचा बचाव करता आला नाही. त्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आलं. अखेर त्याचा मृतदेह बागा किनाऱ्याजवळ सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेबाबत बोलताना त्याच्या मैत्रिणीने सांगितलं की, "मी वरच्या बाजूला खडकांवर उभी होते आणि तो समुद्राच्या अगदी जवळ बसला होता. मी त्याला वारंवार तिकडे जाऊ नको असं सांगितलं होतं. तो दारूही प्यायला होता, पण त्याने माझं ऐकलं नाही."
गोवा पोलिसांच्या माहितीनुसार, अश्पाकला त्याच्या मित्रांनी आणि सोबतच्या महिलेने खडकांवर जाऊन बसू नकोस असा इशारा दिला होता. मात्र त्याने त्यांच्याकडे सूचनांकडे दुर्लक्ष केलं आणि तो समुद्राच्या जवळ असलेल्या धोकादायक भागात जाऊन बसला.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरला असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. समुद्राच्या धोकादायक परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यास किती मोठी दुर्घटना घडू शकते, याचं हे उदाहरण असल्याचं अनेकांनी म्हटलंय.
एका सोशल मीडिया युजरने प्रतिक्रिया देताना लिहिलंय, "समुद्र खवळलेला असेल तर तुम्हाला पोहता येत असो किंवा नसो, तो जीव घेऊ शकतो. अशा ठिकाणी जाऊन बसण्याची गरजच काय होती?" तर दुसऱ्या युजरने म्हटलंय, "जर समुद्र इतका खवळलेला असेल तर त्यामध्ये जाऊ नये हा कॉमन सेन्स आहे."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.