आयपीएलनंतर टीम इंडियात येत्या काही दिवसांत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कसोटी संघात टीम इंडियात संधी न मिळालेल्या श्रेयस अय्यरनं आपल्या कामगिरीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं असून, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत त्यानं पाऊल ठेवलं आहे. अनुभवी कर्णधार रोहित शर्मा, युवा फलंदाज शुभमन गिल आणि विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते, असे मानले जाते.
भारताचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर यानं आयपीएलच्या मागील दोन हंगामात कर्णधार म्हणून 'धाकड' कामगिरी केली आहे. नेतृत्वाच्या कसोटीत खरा उतरलेल्या श्रेयसनं खोऱ्यानं धावाही ओढल्या आहेत. त्यानं आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सला जेतेपद मिळवून दिलं होतं. यावर्षी त्यानं पंजाब किंग्जला फायनलमध्ये नेलं. पण दुर्दैवानं हा कसलेला फलंदाज बराच काळ टी २० संघातून बाहेर होता. आता त्यानं वनडे संघात कमबॅक केलंय. पण कसोटी संघात त्याला स्थान देण्यात आलेलं नाही. अलीकडच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आणि आयपीएलमध्ये त्यानं दमदार कामगिरी केली असून, त्या जोरावर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत तो पोहोचला आहे. सध्याच्या घडीला रोहित शर्मा हा वनडे संघाचा कर्णधार आहे. तर सूर्यकुमार यादव हा टी २० संघाचा कर्णधार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, एका अधिकाऱ्यानं सांगितलं की आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या जोरावर श्रेयस अय्यर हा कर्णधारपदाच्या शर्यतीत आला आहे. या अधिकाऱ्यानं इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, तो सध्या वनडे क्रिकेट खेळतोय. पण आयपीएल स्पर्धेनंतर त्याला टी २० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी संघाबाहेर फार काळ ठेवता येणार नाही. सध्या तो अधिकृतपणे मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारातील टीम इंडियाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत सहभागी झाला आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जने फायनलपर्यंत धडक दिली आहे. २०१४ नंतर पहिल्यांदाच पंजाबचा संघ फायनलपर्यंत पोहोचला आहे. फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून अवघ्या सहा धावांनी पराभव पत्करावा लागला. श्रेयस अय्यरने पंजाब किंग्जचं नेतृत्व करतानाच तुफान फलंदाजी केली आहे. त्यानं १७ सामन्यांमध्ये सहाशेहून अधिक धावा कुटल्या आहेत. त्यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे.
काही महिन्यांपूर्वी श्रेयस अय्यरचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टही रद्द करण्यात आला होता. त्याला कसोटी आणि टी २० संघातूनही वगळण्यात आलं होतं. २०२४ मध्ये कोलकाता संघाला आयपीएलचं जेतेपद मिळवून दिल्यानंतर त्या संघातूनही तो बाहेर पडला होता. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये श्रेयसनं जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर आयपीएल २०२५ मध्येही नेतृत्वकौशल्य सिद्ध करतानाच, फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.