वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार खेळ करत दिल्ली कॅपिटल्स संघावर ३३ धावांनी विजय मिळवला. गेले ३ सामने गमावलेल्या मुंबई इंडियन्सचा हा पहिलाच विजय आहे. हा विजय हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मिळवला असला तरीदेखील हा विजय मिळवून देण्यात रोहित शर्माने मोलाची भूमिका बजावली आहे.
रोहितने २७ चेंडूंचा सामना करत ४९ धावांची खेळी केली. या शानदार खेळीनंतर त्याला एक खास पुरस्कार देण्यात आला. दरम्यान या सामन्यानंतर त्याने हार्दिक पंड्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
या सामन्यानंतर मार्क बाऊचरकडून खास पुरस्कार दिला गेला. हा पुरस्कार स्विकारल्यानंतर,' मला वाटलं की फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. यावरुन स्पष्ट दिसून येतंय की, जर सर्व फलंदाजांनी मिळून सांघिक कामगिरी केली, तर वैयक्तिक कामगिरी फारशी महत्वाची नसते.'
तसेच तो पुढे म्हणाला की, 'हे अशी गोष्ट आहे, ज्याबाबत आपण बऱ्याच काळापासून बोलतोय. फलंदाजी प्रशिक्षक (पोलार्ड), मार्क ( मार्क बाउचर) आणि कर्णधार (हार्दिक पंड्या ) यांना हेच हवे असते.' रोहित हार्दिक पंड्याला समर्थन करताना दिसून आला आहे. (Cricket news in marathi)
हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद मिळाल्यापासून दोन्ही खेळाडूंमध्ये अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा सुरु आहेत. रोहितने आपल्या कामगिरीबद्दल भाष्य केलं. मात्र कर्णधारपदात झालेल्या बदलाबाबत रोहितने अजूनही मौन बाळगलं आहे. रोहितला कर्णधारपदारुन काढणं हे मुंबईच्या फॅन्सला अजिबातच आवडलेलं नाही. त्यामुळे हार्दिक पंड्याला ट्रोल देखील केलं गेलं. सध्या मुंबईने आपला पहिला विजय मिळवला असून. गुणतालिकेत आठव्या स्थानी झेप घेतली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.