गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात भारताने श्रीलंकेचा १६५ रन्सने पराभव केला. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी ३७२ रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या २०६ धावांवर आटोपला. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे.
श्रीलंकेला सामना जिंकण्यासाठी 372 रन्स करायचे होते. गॉलच्या मैदानावर याआधी कधीही 342 पेक्षा मोठ्या स्कोरचा यशस्वी पाठलाग झालेला नव्हता. त्यामुळे श्रीलंकेसमोर सामना जिंकण्यासाठी खूप मोठं आव्हान होते आणि अखेर त्यांना हा चमत्कार करता आला नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या या विजयासह भारताने टेस्ट क्रिकेटमध्ये सलग नववा विजय मिळवला आहे. श्रीलंकेने भारताला शेवटचं 2015 मध्ये झालेल्या टेस्ट सामन्यात पराभूत केलं होतं. त्यानंतर दोन्ही टीम्समध्ये 11 टेस्ट सामने झाले असून त्यापैकी भारताने 9 सामने जिंकलेत. तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. म्हणजेच श्रीलंकेला गेल्या 11 वर्षांत टेस्ट क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही.
गॉल टेस्टमध्ये भारताच्या विजयाचा सर्वात मोठा शिल्पकार ठरला तो मानव सुथार. त्याची तुलना टीम इंडियाचा पुढचा रवींद्र जडेजा म्हणून केली जातेय. सुथारने या सामन्याच्या पहिल्या डावात 4 विकेट घेतल्या तर दुसऱ्या डावात त्याने तब्बल 6 फलंदाजांना बाद केलं. दुसऱ्या डावातील 76व्या ओव्हर्समध्ये त्याने एकाच वेळी श्रीलंकेच्या तीन फलंदाजांना बाद करत सामन्याचं चित्रंच पालटून टाकलं. त्यामुळे त्याच्या नावावर या सामन्यात एकूण 10 विकेट्स जमा झाल्यात.
गॉल इंटरनॅशनल स्टेडियमवर एका टेस्ट सामन्यात 10 विकेट घेणारा मानव सुथार हा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी हा पराक्रम रविचंद्रन अश्विन आणि हरभजन सिंह यांनी केला होता. विशेष म्हणजे गॉलच्या मैदानावर 10 विकेट घेणारा सुथार हा डावखुरा परदेशी गोलंदाजांमध्ये दुसरा गोलंदाज आहे. त्याच्याआधी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने 2016 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 11 विकेट घेतल्या होत्या.
मानव सुतारने सामन्यात 10 विकेट घेतल्या असल्या तरी भारत आणि श्रीलंका यांच्यातील फरक निर्माण करण्यात देवदत्त पडिक्कलच्या पहिल्या डावातील शतकाची मोठी भूमिका होती. पडिक्कलने भारताच्या पहिल्या डावात तब्बल 167 रन्सची मोठी खेळी केली. त्याने एकट्याने टीमचा डाव मजबूत केला. दुसऱ्या डावातही पडिक्कलने 44 रन्स करत मोठं योगदान दिलं.
या सामन्यात रवींद्र जडेजानेही आपल्या टेस्ट कारकिर्दीत आणखी एक मोठा टप्पा गाठलाय. जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये 350 विकेट पूर्ण केल्या. त्यामुळे मानव सुथारची शानदार गोलंदाजी, देवदत्त पडिक्कलचे शतक आणि जडेजाचा 350 विकेटचा टप्पा यामुळे भारताचा गॉल टेस्टमधील विजय आणखी खास ठरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.