आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील २१ व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ४ धावांनी विजय मिळवला आहे. दरम्यान या सामन्यात चेंडू सीमा रेषेपार जाऊनही अंपायरने बाऊंड्रीची घोषणा केली नाही. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
बांगलादेशला हा सामना ४ धावांनी गमवावा लागला आहे. या त्याच ४ धावा आहेत, ज्या अंपायरने दिल्या नाहीत असं फॅन्सचं म्हणणं आहे. दरम्यान काय सांगतो नियम? जाणून घ्या.
तर झाले असे की, बांगलादेशचा संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेकडून १७ वे षटक टाकण्यासाठी ओटनील बार्टमॅन गोलंदाजीला आला होता. बांगलादेशकडून महमदुल्लाह फलंदाजी करत होता. त्यावेळी बार्टमॅनने टाकलेला चेंडू महमदुल्लाहच्या पॅडला जाऊन लागला. पॅडला लागताच हा चेंडू ४ धावांसाठी सीमारेषेपार गेला. गोलंदाजाने जोरदार अपील केली आणि अंपायरने त्याला बाद घोषित केलं.
महमदुल्लाहने क्षणही न दवडता डीआरएसची मागणी केली आणि तिसऱ्या अंपायरने तो नॉट आऊट असल्याचा निर्णय दिला. फलंदाज बाद नव्हता, मग चौकार का नाही दिला? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल ना? तर जाणून घ्या काय सांगतो नियम.
नियमानुसार, जर अंपायरने फलंदाजाला बाद घोषित केलं त्यानंतर डीआरएस घेऊन निर्णय बदलला तरी देखील तो चेंडू डेड होतो. त्यामुळेच बांगलादेशला ४ धावा दिल्या गेल्या नाहीत. जर या ४ धावा दिल्या गेल्या असत्या, तर नक्कीच बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला असता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.