इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या ५५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सविरुद्ध ३ विकेट्स राखून थरारक विजय मिळवला. या विजयामुळे दिल्लीने प्लेऑफच्या शर्यतीत आपलं स्थान कायम ठेवलंय. परंतु सामन्यानंतर दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलच्या एक कृत्याने मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळतंच.
यावेळी अक्षर पटेलवर मॅच-फिक्सिंगचे गंभीर आरोप केले जातायत. मात्र सत्य परिस्थिती वेगळी आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आलीये.
पंजाब किंग्स फलंदाजी करत असताना ही घटना घडली. यामध्ये अक्षर पटेलने एक सोपा कॅच सोडला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे चाहते संतापले आणि सोशल मीडियावर त्याला विलन म्हणू लागले. काही युजर्सने ही घटना जाणूनबुजून केली असून ती चूक असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला आणि हे मॅच-फिक्सिंग आहे, असे खडे बोल अक्षरला सुनावलेत.
वाद वाढल्यानंतर आणि तांत्रिक बाबी तपासल्यावर सत्य समोर आले. खरं तर ज्या बॉलवर अक्षरने कॅच सोडला तो फ्री-हिट होता. गोलंदाज अकीब नबी दारने त्याआधीच्या चेंडूवर नो-बॉल टाकला होता. नियमांनुसार, यानंतर फ्री-हिटवर फलंदाज कॅच आऊट होऊ शकत नाही.
पंजाबचा ओपनर प्रियांश आर्याने त्यावेळी हवेत फटका मारला, पण फलंदाज आऊट होणार नाही हे माहीत असल्याने अक्षर पटेलने बोटांना दुखापत होण्याच्या भीतीने झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, टीमला विकेट न मिळवून देणारा कॅच घेण्याची रिस्क न घेणं हे अक्षर पटेलचं शहाणपण होतं.
मात्र हा सामना जिंकूनही अक्षर पटेलला फटका बसला आहे. बीसीसीआयने दिल्ली कॅपिटल्सवर स्लो ओव्हर टाकल्याबद्दल कारवाई केलीये. कर्णधार अक्षर पटेलला या सिझनमधील त्याच्या पहिल्या चुकीसाठी १.२ दशलक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान यानंतर आता दिल्ली आपल्या पुढील सामन्यांमध्ये ही लय कायम ठेवू शकते की नाही, हे पाहावं लागणार आहे.