आशिया कप २०२५ मध्ये भारत वि. पाकिस्तान सामना होणार.
हा सामना रद्द व्हावा यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल.
सामना रद्द व्हावा यासाठी याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
India Vs Pakistan : आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबर रोजी सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत रविवारी १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना रद्द व्हावा यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली. आशिया कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी करणाऱ्या पीआयएलवर त्वरित सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.
न्यायमूर्ती जे.के.माहेश्वरी आणि न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आले, तेव्हा कोर्टाने ही याचिका गांभीर्याने घेण्यास नकार दिला. 'हा फक्त एक सामना आहे, तो होऊ द्या, काय घाई आहे?; असे न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी स्पष्ट केले. 'भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी (१४ सप्टेंबर) आहे. जर सुनावणी शुक्रवारीही (१२ सप्टेंबर) सुनावणी झाली नाही, तर ही याचिका निरर्थक होईल', असे युक्तिवाद वकिलांनी केला. त्यावर न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी 'सामना या रविवारी आहे? यात आता आपण काय करु शकतो? हा सामना होऊ द्या' असे स्पष्टपणे सांगितले.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द करावा अशी याचिका चार कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दाखल केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानशी सामना खेळणे हे राष्ट्रहिताच्या विरुद्ध आहे. हा सामना खेळल्याने शहीद झालेले सैनिक आणि नागरिकांच्या बलिदानाचा अपमान होईल, असे या विद्यार्थ्यांचे मत आहे.
'ज्या देशाशी लढताना आपले सैनिक प्राण देत असतात, त्याच देशासोबत क्रिकेट खेळल्याने चुकीचा संदेश जातो. यामुळे शहीदांच्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जातील. मनोरंजनाला राष्ट्राच्या सुरक्षिततेपेक्षा आणि प्रतिष्ठेपेक्षा वरचे स्थान देता येणार नाही', असे याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा, २०२५ लागू करावा. सीझन बॉल क्रिकेटला मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या कक्षेत आणावे. बीसीसीआयला क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत आणावे, असे म्हणत याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.