अखिलेश यादव यांनी भाजप तीन राज्यांतील मुख्यमंत्र्यांना हटवण्याचा दावा केला.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचे नाव चर्चेत आले आहे.
मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेमुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे.
महाराष्ट्रानंतर आणखी एका भाजपशासित राज्यात मोठी उलथापालथ होणाची शक्यता आहे. थेट मुख्यमंत्री बदलाची चर्चा तेथील राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे एक नाही तर तब्बल तीन राज्यांमधील मुख्यमंत्र्यांना हटवण्यात येणार असल्याची चर्चा विरोधी पक्षांमध्ये जोरदार सुरू आहे. एकीकडे भाजप विविध राज्यातील विरोधी पक्षांना नेस्तनाबूत करू पाहत आहे, दुसरीकडे आपल्याच पक्षातील मुख्यमंत्र्यांना हटवत असल्याच्या चर्चांना पेव फुटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे सध्या जमिनीच्या वादात अडकले असून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. त्याचवेळी त्यांना विरोधी पक्षाकडूनही पाठिंबा मिळत आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मोहन यादव यांच्या समर्थनार्थ निवेदन जारी केले.
मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याविरुद्ध कट रचला जात असल्याचा आरोपही अखिलेश यादव यांनी केला आहे. त्याचवेळी त्यांनी भाजपशासित राज्यातील तीन मुख्यमंत्र्यांना हटवण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अखिलेश यादव यांच्या दाव्यामुळे फक्त उत्तर प्रदेशसह आणखी दोन राज्यातील राजकारण तापलंय.
मोहन यादव यांचा बचाव करताना अखिलेश यादव यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. दरम्यान मोहन यादव यांच्याव जमिनीशी संबंधित आरोप केले जात आहेत, त्यावर बोलताना अखिलेश यादव म्हणाले की ते आधी रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत होते. मोहन यादव यांना आणि तीन मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोपही अखिलेश यादव यांनी केला आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दावा केला की, मोहन यादव मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी उज्जैनमध्ये अनेक भूखंड खरेदी केला. त्यानंतर त्या भूखंडांच्या परिसरात विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या वर्तमानपत्रातील वृत्ताचा संदर्भ देत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनीही मोहन यादव यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला. दरम्यान मोहन यादव यांना अशा एका पक्षाकडून पाठिंबा मिळाला ज्याची कदाचित खुद्द मुख्यमंत्र्यांनीही अपेक्षा केली नसेल. लखनौमध्ये पत्रकारांशी बोलताना सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उघडपणे मोहन यादव यांची उघडपणे पाठराखण केली.
मोहन यादव यांची बदनामी करण्याचे कारस्थान भाजपने रचले आहे. जर मोहन यादव यांच्यावर असे आरोप होत असतील, तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ३०० ते ६०० एकर जमीन संपादित केली आहे. यात काहीही नवीन नाहीये. दरम्यान मोहन यादव हे आधी रिअल इस्टेट क्षेत्रात काम करायचे."भाजपला हे माहीत नाही का? असा सवाल अखिलेश यादव यांनी विचारला आहे. भाजप असे आरोप करत आहे, त्यामागे देखील मोठं कारस्थान आहे. कारण भाजपला तीन मुख्यमंत्र्यांना बदलायचं आहे. भाजपला मुख्यमंत्री बदलायचे आहेत आणि म्हणूनच ते हे आरोप घडवून आणत आहेत.
भाजपचा मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना हटवण्याचा मानस आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे रोख वळवत अखिलेश यादव म्हणाले, "भाजप या दोघांना हटवत आहेत कारण त्यांचे अंतिम उद्दिष्ट उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवणं हेच आहे. पदावरून दूर करण्याचे कारस्थान रचले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.