हवामान खात्याचा १३ राज्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट
महाराष्ट्र, गुजरात, आसाम, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांवर पुराचं संकट कायम
२४ ते २९ सप्टेंबरदरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज
मराठवाडा, विदर्भात पिकांचं प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांचा आक्रोश
मान्सूनचा अखेरचा प्रवास सुरू झाला आहे. पुढील सात दिवसांत पूर्णपणे माघार घेणार आहे. पण परतीच्या वाटेवरील पावसानं महाराष्ट्रासह अनेक राज्यांत अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्यासह काही भागांत तर शेती, संसार उद्ध्वस्त केलं आहे. दुसरीकडं हवामान खात्यानं पुढील सहा दिवसांसाठी धडकी भरवणारा अंदाज वर्तवला आहे. जवळपास १३ राज्यांसाठी हा अलर्ट दिला आहे.
महाराष्ट्रातील मराठवाड्यात पावसानं दैना केली आहे. सगळ्यांची दाणादाण उडवली आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. खरडून निघालेली शेती बघून शेतकरी त्या शेतातच टाहो फोडत आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे. तिकडं पश्चिम बंगालमधील कोलकातामध्येही पावसानं थैमान घातलं आहे. त्यात हवामान खात्यानं पुढील सहा दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे.
पुढील सहा दिवस महाराष्ट्रासह आसाम, मेघालय, भारताच्या पूर्वेकडील राज्ये आणि दक्षिण भारतात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या उत्तर भारतातील अनेक राज्यांमधील नागरिकांना उकाड्यानं हैराण केलं आहे. पण दिल्ली - एनसीआरमध्ये पुढील दोन - तीन दिवसांत तापमानात बदल होण्याची दाट शक्यता आहे.
हवामान खात्याच्या ताज्या अहवालानुसार, पूर्व आणि मध्य भारतात पुढील पाच दिवस ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ओडिशा, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये २४ ते २७ सप्टेंबरपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २४ सप्टेंबरला बिहार, २४ आणि २५ सप्टेंबरला झारखंड आणि पश्चिम बंगालमधील वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
पश्चिम भारतात पुढील सात दिवस वेगवेगळ्या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये २७ ते २९ सप्टेंबर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, कोकण, गोव्यात २६ ते २९ सप्टेंबरपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आदी राज्यांतील विविध ठिकाणी २४ ते २९ सप्टेंबरपर्यंत तुफान पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे.
दक्षिण भारतात २४ ते २८ सप्टेंबरपर्यंत आंध्र प्रदेशचा किनारी पट्टा आणि तेलंगणा, तसेच २५, २६ आणि २७ सप्टेंबर या काळात तामिळनाडू, २५ ते २८ सप्टेंबरपर्यंत केरळ, २६ आणि २७ सप्टेंबरला रायलसीमा आणि कर्नाटकच्या किनारी पट्ट्यात वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.