देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला. ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर आता त्यांच्या राजकीय कारकीर्द, त्यांच्या आयुष्याबद्दलचे अनेक किस्से समोर येत आहेत. मनमोहन सिंग यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री आणि पंतप्रधान अशा भूमिकांच्या माध्यमातून ठसा उमटवला आणि देशाला प्रगतीपथावर नेऊन ठेवले होते. मनमोहन सिंग यांना एक फोन आला होता या फोनमुळे त्यांचे आयुष्य बदललं होतं. तो फोन कोणाचा होता, तो किस्सा काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत...
जून १९९१ ची ही गोष्ट आहे. मनमोहन सिंग झोपले होते. एका कॉन्फरन्समध्ये सहभागी होऊन तो नेदरलँडहून परतले होते आणि खूप थकले होते. तेवढ्यात डॉ. मनमोहन सिंग यांचे जावई विजय तनखा यांच्या फोनची रिंग वाजली. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांचे सहकारी पीसी अलेक्झांडर यांनी हा कॉल केला होता.
अलेक्झांडर यांनी विजय तंखा यांना मनमोहन सिंग यांना जागे करण्यास सांगितले. अलेक्झांडर यांनी सांगितले की, पीव्ही नरसिंह राव यांना तुम्हाला अर्थमंत्री बनवायचे आहे. मनमोहन सिंग यांनी तो फोन गांभीर्याने घेतला नसल्याचे सांगितले जात होते. मात्र काही वेळाने मनमोहन सिंग आणि पीसी अलेक्झांडर यांची भेट झाली. शपथविधीच्या एक दिवस आधी ही घटना घडली होती.
१९९१ मध्ये नरसिंह राव पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना अर्थ मंत्रालयासाठी सक्षम व्यक्तीची गरज होती. त्यासाठी त्यांचा शोध सुरू होता. दोन दिवसांपूर्वी कॅबिनेट सचिव नरेश चंद्र यांनी नरसिंह राव यांना एक चिठ्ठी पाठवली होती ज्यामध्ये देशाची आर्थिक स्थिती बिघडत असल्याचे त्यांनी सांगितले होते. देशाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी कोणीतरी चांगली व्यक्ती अर्थमंत्री पदावर असावा यासाठी नरसिंह राव यांनी प्रयत्न सुरू केले होते. अशामध्ये पीसी अलेक्झांडर यांनी मनमोहन सिंग यांचे नाव सुचवले.
पीसी अलेक्झांडर हे त्यावेळी नरसिंह राव यांचे सल्लागार होते. नरसिंह राव यांनी त्यांना सांगितले की, अर्थमंत्रिपदासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तीची गरज आहे. अलेक्झांडर यांनी त्यांना आरबीआयचे माजी गव्हर्नर आयजी पटेल यांचे नाव सुचवले, पण आई आजारी असल्याने त्यांनी नकार दिला. त्यानंतर अलेक्झांडर यांनी मनमोहन सिंग यांचे नाव सुचवले.
मनमोहन सिंग यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केला आहे. मनमोहन सिंग यांनी सांगितले होते की, नवीन सरकारमध्ये माझा मंत्रिमंडळात समावेश झाल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला. मला नंतर अर्थमंत्रालय देण्यात आले. पण पीव्ही नरसिंह राव यांनी मला आधीच सांगितले होते की मी अर्थमंत्री होणार आहे.
मनमोहन सिंग यांचा राजकीय प्रवास देशाच्या अर्थमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुरू झाला. १९९१ मध्ये ते आसाममधून राज्यसभा सदस्य झाले. त्यांचा अर्थमंत्री म्हणून १९९१ ते १९९६ असा कार्यकाळ होता. अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग आर्थिक उदारीकरणाचे नेते बनले. मनमोहन सिंग अर्थमंत्री झाल्यानंतर परवानाधारक राज संपले, परदेशी गुंतवणूक वाढली आणि नोकऱ्या आल्या. यानंतर मनमोहन सिंग १९९८ ते २००४ पर्यंत विरोधी पक्षनेते आणि त्यानंतर २००४ ते २०१४ पर्यंत देशाचे पंतप्रधान होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.