हुंडा प्रथारुपी वाळवीनं अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. लग्न करून नव्या संसाराची स्वप्ने रंगवणाऱ्या अनेक नवविवाहित तरुणींचे बळी या हुंडा प्रथेने घेतले आहेत. तर हुंड्यासाठी हपापलेले तरूण, त्यांचे आई-वडील यांच्या भोळ्या चेहऱ्यामागचा क्रूर चेहरा जगासमोर आला आहे. अशीच एक धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे घडली आहे. लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला. तिने आत्महत्या करून स्वतःला संपवलं, असं तिच्या नवऱ्यानं सगळ्यांना भासवण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस तपासात त्याचा क्रूर चेहरा जगासमोर आला.
श्रीकाकुलमची रहिवासी तेजश्रीचं लग्न दोनच महिन्यांपूर्वी झालं होतं. फक्त पैशांच्या हव्यासापोटी पतीनं तिला निर्घृणपणे संपवलं. तिनं आत्महत्या केली असं या नराधमानं भासवलं. पण पोलीस तपासात त्याचं बिंग फुटलं. तेजश्रीच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. त्यामुळं ही हत्या असावी, असा संशय पोलिसांना आहे.
तेजश्रीच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न तिच्या आईवडिलांनी बघितलं होतं. श्रीकाकुलमच्याच अरगोलू गावातील दप्पा सोमेश्वर राव नावाच्या तरुणासोबत तिचं लग्न लावून दिलं. डॉकयार्डमध्ये नोकरीला असल्याचं त्यानं लग्नाच्या आधी सांगितलं होतं. तसंच रामा टॉकीज परिसरात स्वतःचं हॉस्टेल असल्याचाही दावा केला होता. त्यातून महिन्याला दोन लाख रुपये उत्पन्न मिळतं, अशी बतावणी केली होती.
आपली मुलगी एका श्रीमंत घरात नांदायला जाते याचा आनंद आई-वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यामुळं कर्ज काढून त्यांनी ६ मार्चला अगदी थाटामाटात लग्न लावून दिलं. हुंडा म्हणून १८ लाख रुपये रोख, १९ तोळे सोने आणि अन्य किंमती वस्तू असा एकूण खर्च जवळपास २८ लाखांच्या घरात गेला होता. पण हा सगळा एक दिखावा होता.
लग्नानंतर सोमेश्वर तेजश्रीला विशाखापट्टणमच्या रेसापुवनिपलेम येथील घरी घेऊन गेला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच त्यानं सरड्यासारखा रंग बदलला. पोलीस तपासात समोर आलेली माहिती धक्कादायक होती. मी तिच्या सौंदर्याला भुलून नाही तर पैशांसाठी तिच्यासोबत लग्न केल्याची कबुली आरोपीनं दिली.
विशाखापट्टणमला पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच छळ सुरू झाला. आणखी पैसे माहेरहून घेऊन येण्यासाठी त्यानं शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. इतकेच नाही तर सोमेश्वरचे अन्य तरुणींसोबत प्रेमसंबंध होते, त्यामुळे नवरा-बायकोमध्ये वाद होत होते, अशी माहितीही पोलीस तपासात समोर आली आहे.
आपली मुलगी तेजश्री कशी आहे, तिची विचारपूस करण्यासाठी ७ तारखेला आईने कॉल केला. बऱ्याचदा रिंग होऊनही समोरून कोणताही प्रतिसाद आला नाही. शेवटी बऱ्याचवेळी प्रयत्न केला त्यावेळी सोमेश्वरने स्वतः फोन उचलला. त्यावेळी तेजश्रीनं गळफास घेऊन आत्महत्या केली, असं त्यानं शांतपणे सांगितलं. हे ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आई-वडील लगेच विशाखापट्टणमला पोहोचले. मुलगी निपचित पडली होती. तिच्या शरीरावर व्रण होते. गळ्यावर खूण होती. सोमेश्वरने तिला मारहाण केली असावी आणि नंतर गळा आवळून हत्या केली असावी, असा संशय त्यांना आला. त्यांनी सोमेश्वरवर तेजश्रीच्या हत्येचा आरोप केला.
तेजश्रीच्या आईने थ्री टाउन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या आधारे पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून घेतला. आरोपी सोमेश्वर राव याला अटक करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. मृत्यूचे नेमके कारण यातून स्पष्ट होणार आहे. प्राथमिक तपासात तिला ब्लॅकमेल करून हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.