लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात काँग्रेसने अविश्वास ठराव मांडला आहे. विरोधकांना बोलू दिले जात नाही, असा आरोप करत काँग्रेसकडून ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. लोकसभामध्ये राहुल गांधी अन् प्रियंका गांधी आक्रमक झाले होते. काँग्रेस नेत्यांना सभागृहात बोलू दिले जात नाही, लोकशाहीचा आवाज दाबला जातोय, सत्ताधाऱ्यांना झुकते माप दिले जाते.. असा आरोप करत लोकसभा अध्यक्षांविरोधात नियम ९४(क) अंतर्गत अविश्वास ठराव मांडलाय.
नियम ९४(क) नुसार, लोकसभेतील विरोधी पक्षाने ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची सूचना लोकसभेच्या महासचिवांना सादर केली आहे. या सूचनेवर ११८ खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. काँग्रेस, सपा, डावे आणि राजदसह जवळजवळ सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांनी या प्रस्तावावर सह्या केल्या आहेत. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) ने यापासून स्वतःला दूर ठेवले आहे. दरम्यान, काँग्रेस खासदार सुरेश कोडिकुनिल, गौरव गोगोई, मोहम्मद जावेद हे लोकसभेच्या महासचिवांकडे सूचना देण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी ११८ खासदारांच्या सह्यांचे पत्र महासचिवांना सादर केलेय.
लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव का?
लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांचा आवाज दाबलाय. विरोधकांना बोलण्यास वेळ देत नाही. त्यांनी सभागृहाच्या कामकाजात पक्षपाती दृष्टिकोन स्वीकारल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा म्हणाल्या की, सभापतींनी स्वतःचा अनादर केलाय. त्यांच्यावर विधान करण्यासाठी दबाव आहे, हे चुकीचे आहे. पंतप्रधानांवर कुणी हल्ला करण्याचा प्रश्नच नाही. अध्यक्षांवर सरकारने दबाव आणलाय. त्यामुळे अध्यक्षांना पंतप्रधान सभागृहात येणार नसल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले, हे अतिशय चुकीचं आहे.
अविश्वास ठराव मांडण्यासाठी अटी कोणत्या?
लोकसभा अध्यक्षांना काढण्यासाठी अथवा बदलण्यासाठी संविधानाच्या कलम ९४ नुसार अर्ज करावा लागतो. त्यासाठी कमीतकमी ५० खासदारांच्या सह्या लागतात. प्रस्तावाचा संपूर्ण मजकूर महासचिवांना लेखी स्वरूपात सादर करावा लागतो. या प्रस्तावात अध्यक्ष अथवा उपाध्यक्ष यांच्याविरोधातील आरोप स्पष्टपणे लिहिले असावेत. युक्तिवाद, अनुमान, उपरोध, आरोप किंवा बदनामीकारक विधाने नसावीत. महासचिवांकडे अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केल्यानंतर १४ दिवसांच्या आत त्यावर निर्णय घेतला जातो.
ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव टिकेल का?
ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव टिकण्याची शक्यता धुसूर आहे. कारण काँग्रेससह देशातील विरोधी पक्षांच्या खासदारांची संख्या २२० इतकी आहे. पण त्यांच्याविरोधात मते करणाऱ्या एनडीएच्या खासदारांची संख्या जात्त आहे. एनडीएकडे स्पष्ट बहुमत असल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव टिकण्याची शक्यता नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.