BJP to contest West Bengal civic elections alone : पश्चिम बंगालमधील आगामी महापालिका निवडणुकांआधी भाजपने बंडखोर खासदारांना जोरदार धक्का दिल्याची माहिती समोर आली आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) सोडून भाजपप्रणीत एनडीए (NDA) मध्ये समाविष्ट झालेल्या सायोनी घोष, काकोली घोष दस्तीदार आणि युसूफ पठाण यांसारख्या बंडखोर नेत्यांना भाजपने धक्का दिला आहे. भाजप बंगालमधील आगामी निवडणुका कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावर लढणार असल्याची अधिकृत माहिती पक्षाने दिली आहे.
पश्चिम बंगालमध्ये लवकरच कोलकाता (KMC) आणि हावडा महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या बंडखोर खासदारांनी 'नॅशनल सिटिजन्स पार्टी ऑफ इंडिया' (NCPI) मध्ये प्रवेश केला होता. हे सर्व नेते भाजपसोबत युती करून महापालिका निवडणुका लढवण्याच्या तयारीत होते. पण इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भाजपचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांनी भाजप कुणासोबतही युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भट्टाचार्य म्हणाले की, "पश्चिम बंगालमध्ये भाजपचा कोणती युती करणार नाही. आम्ही कोलकाता आणि हावडा महापालिका निवडणुका स्वबळावर लढू आणि जिंकू."
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, तृणमूलमधून आलेल्या या बंडखोर नेत्यांविरोधातच भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून लढा दिला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत त्यांच्याशी हात मिळवणी केल्यास पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे भाजप आपल्या स्वतःच्याच संघटन आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक लढवणार आहे.
बंडखोर खासदारांना युतीची आशा
खासदार दस्तीदार म्हणाले की, "आम्ही भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सर्वात मोठे भागीदार आहोत. पालिका निवडणुका एकत्र लढवू. त्यासाठी आम्हाला भाजपसोबत आघाडी करावी लागेल. आम्ही निवडणुकांनंतर निर्णय घेऊ, पण आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. २०९ जागांसाठी निवडणुका होणार आहेत.
दस्तीदार यांच्यासह बहुतांश खासदारांनी राजधानी दिल्लीत नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली. सयोनी घोष यांचाही त्यात समावेश होता.
दरम्यान, नगरसेवकांपासून ते खासदारांपर्यंत फुटीचा सामना करत असलेला ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षही स्थानिक निवडणुका लढवण्याची तयारी करत आहे. पक्षाचे नेते कुणाल घोष म्हणतात, आम्ही तयार आहोत आणि चांगले निकाल मिळवू. पण, मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेबद्दल आमच्या मनात आक्षेप आहेत. ही प्रक्रिया लोकसंख्येवर आधारित असायला हवी होती, पण भाजपला फायदा व्हावा यासाठी ती मतदारांच्या आधारावर करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.