दिल्ली कोर्टाने शनिवारी बिहारमधील संहिबगंज येथील भाजप आमदार राजू कुमार सिंहला खून प्रकरणात दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्याला तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्याची पत्नी रेनू सिंह तसेच इतर दोन आरोपींना सर्व आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. ही घटना 31 डिसेंबर 2018 रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आलेल्या पार्टीदरम्यान अर्चना गुप्ता यांच्या मृत्यूशी संबंधित आहे. या प्रकरणी 1 जानेवारी 2019 ला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी विशेष न्यायाधीश विशाल गोगने यांनी राजू कुमार सिंह यांना कलम 304 च्या अनुसार दोषी ठरवले. मात्र कोर्टाने त्यांची पत्नी रेनू सिंह, राणा राजेश सिंह आणि रामेंद्र सिंह यांना सर्व आरोपातून मुक्त केले. 9 जूनला कोर्ट या प्रकरणी शिक्षा सुनावणार आहे. या खटल्यातून निर्दोष मुक्तता करावी अशा विनंतीची याचिका आरोपीने 30 ऑक्टोबर 2023 रोजी कोर्टाकडे केली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळली. त्यानंतर कोर्टाने आरोपीच्या विरोधात आरोप निश्चित केले.
31 ऑक्टोबर 2018 ला तक्रारदार विकास गुप्ता त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत दिल्लीतील एका फार्म हाऊसवर गेले होते. हा फार्म हाऊस त्यांचा मित्र संजीव सिंह यांचा आहे. ते म्हणाले की रात्री 12 वाजता त्यांच्या पत्नीने त्यांना मिठी मारली आणि परत डान्स फ्लोअरवर गेल्या. त्याचवेळी सुरक्षारक्षक हरी सिंह आणि संजीव सिंह यांचे भाऊ राजू सिंह यांना हवेत गोळीबार करताना बघितले. त्यानंतर 5 मिनिटांनी राजू सिंह यांनी पुन्हा गोळीबार केला आणि त्यानंतर विकास गुप्ता यांनी बघितले की, त्यांची बायको रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. त्यानंतर त्यांनी तातडीने त्यांच्या बायकोला रुग्णालयात दाखल केले.
तपासादरम्यान समोर आले की, गोळीबार करणारा भाजप आमदार राजू सिंह आणि त्यांचे ड्रायव्हर हरि सिंह हे दोघे घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलिसांनी त्यांना 2 जानेवारी 2019 रोजी उत्तर प्रदेशातील फाजिलनगर येथून अटक केली. राजू सिंह याच्याकडून .22 कॅलिबर पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.