जर तुम्ही पश्चिम रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. यामुळे दररोज कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. यामध्ये एकूण १५ डब्ब्यांच्या एसी लोकल प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे.
वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं एसी लोकलची संख्या वाढवायचं ठरवलं आहे. प्रवाशांकडून एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिलीये. अधिकृत माहितीनुसार, १ मे २०२६ पासून सध्या धावणाऱ्या १२ डब्यांच्या १७ साध्या लोकल आणि १५ डब्यांच्या काही गाड्या अपग्रेड करून एसी लोकल करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे १२ नवीन एसी लोकल सेवाही सुरू केल्या जाणार आहेत.
अतिरिक्त लोकल सेवा वाढवताना १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या देखील वाढवली जातेय. त्यामुळे अशा लोकलची एकूण संख्या २२७ वरून थेट २४४ पर्यंत जाणार आहे. यामध्ये खास बाब म्हणजे पहिल्यांदाच विरार–डहाणू रूटवर १५ डब्यांच्या ८ गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना होणारी गैरसोय आता कमी होणार आहे.
तर दुसरीकडे लांब पल्ल्याच्या गाड्यांना अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाइन्स या स्थानकांवर थांबा मिळणार नाही. त्याऐवजी या गाड्या थेट दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरच डबल हॉल्ट घेणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना थोडा दिलासा मिळणार आहे.
त्याचप्रमाणे रेल्वेने १२ नॉन-एसी लोकलचं रूपांतर करून त्यांना १२ डब्यांच्या एसी लोकलमध्ये बदललंय. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार एसी लोकलची संख्या १३३ वरून १४५ पर्यंत वाढणार आहे. तर विकेंडच्या दिवशी ही संख्या १०६ वरून ११८ पर्यंत जाणार आहे.
हा निर्णय खास करून गर्दीच्या वेळेत प्रवाशांना जास्त गाड्या उपलब्ध व्हाव्या यासाठी घेतला गेल्याचं सांगण्यात आलंय. काही लोकलच्या वेळापत्रकात थोडेफार बदल होऊ शकतात. मात्र, मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितलं की, सध्याचं वेळापत्रक मोठ्या प्रमाणात न बदलता प्रवाशांची सोय वाढवण्यासाठी या सेवा वाढवल्या आहेत.