मुंंबई : विधानसभा निवडणुकीआधी प्रचारात कमालीचा आक्रमक झालेला आणि भाजपवर टीकेची झोड उठवणारा ठाकरे गट निकालानंतर काहीसा नरमला असल्याचं चित्र आहे. राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येणार असल्यानं भाजपसोबत जुळवून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून रश्मी शुक्लांना हटवण्यासाठी काँग्रेसपाठोपाठ ठाकरे गटही आग्रही होता. पण आता याच ठाकरे गटाच्या नेत्यानं रश्मी शुक्ला यांनी पुन्हा नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन केलं आहे. यावरून ठाकरे गट भाजपशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. त्याचदरम्यान, निवडणूक आयोगानं रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदावरून तडकाफडकी बदली केली होती. त्यांच्या जागी निवडणूक आयोगानं संजय वर्मा यांची नियुक्ती केली होती. पण निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली.
यासंबंधी एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता. शुक्ला यांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात चकमक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पण आता महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटानं नमती भूमिका घेतल्याचे चित्र आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी रश्मी शुक्ला यांचे अभिनंदन केले आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा भार स्वीकारल्याबद्दल रश्मी शुक्ला यांचे अभिनंदन, असं ट्विट नार्वेकर यांनी केलं आहे. या ट्विटनंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. निवडणूक निकालानंतर ठाकरे गट भाजपसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय की काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.