विसर्जन मिरवणुकीसाठी लवकर मार्ग मिळावा, अशी गणेश मंडळांची मागणी
पोलिसांसमोर "एक मंडळ, एक ढोल पथक" धोरणाची सूचना
टिळक रोडवर मिरवणूक सकाळी ८ वाजता सुरू करण्याचा प्रस्ताव
"सन्मान हवाच, पण न्यायही हवा" या भावनेने मंडळांची स्पष्ट भूमिका
पुणे शहरातील आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, विसर्जन मिरवणुकीसंबंधी नव्या वादाला तोंड फुटले आहे. मानाच्या गणपतीपासून सुरू होणाऱ्या पारंपरिक मिरवणुकीच्या वेळेवरून आणि इतर मंडळांना दिल्या जाणाऱ्या परवानग्यांवरून यंदा नव्या तीव्र मागण्या समोर येत आहेत. “आम्ही सकाळी ७ वाजता लक्ष्मी रस्त्यावर मिरवणुकीसाठी निघणार आहोत. इतकी वर्षं तुम्हाला सन्मान दिला, आता आमचाही हट्ट पूर्ण करा,” असा स्पष्ट संदेश अनेक प्रमुख गणेश मंडळांकडून दिला गेला आहे.
या वादळाचा केंद्रबिंदू म्हणजे विसर्जन मिरवणुकीसाठी लागणारा वेळ आणि मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीनंतर इतर मंडळांना मिळणारा अपुरा वेळ. वर्षानुवर्षे ठरलेली पारंपरिक मिरवणूक पाहणारे पुणेकर यंदा बदलते सूर ऐकू लागले आहेत. काही मंडळांनी थेट पोलिसांना विनंती केली आहे की, “आम्हाला सकाळी लवकर मार्गस्थ होऊ द्या किंवा तुम्ही वेळेत मिरवणूक सुरू करा, म्हणजे आम्ही नंतर येऊ.” याच अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मानाच्या गणपतींच्या व्यतिरिक्त असलेल्या गणेश मंडळांनी आपल्या अडचणी स्पष्टपणे मांडल्या. बैठकीत अनेक ठळक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात “एक मंडळ एक ढोल पथक” हे धोरण राबवावे, जेणेकरून आवाजाचा गोंगाट, वेळेचा अपव्यय आणि गोंधळ टाळता येईल, अशी सूचना पोलिसांसमोर आली.
तसेच, बेलबाग चौक ते नाना पेठ रस्ता गणेशोत्सवाच्या काळात मोकळा ठेवावा, जेणेकरून मिरवणुकीचा मार्ग अधिक सुलभ होईल, अशी एक मोठी मागणी अनेक मंडळांनी एकमुखाने मांडली. यावर्षी टिळक रोडवरून होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात सकाळी ८ वाजता होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे, मात्र वेळेच्या अचूक पालनावर जोर देण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात पुण्यात हजारो गणेश मंडळे, लाखो नागरिक आणि पोलिस यंत्रणा एकत्र येतात. अशा वेळी नियोजनाचा अभाव असेल, तर गोंधळ होणे अपरिहार्य असते. त्यामुळेच यावर्षी अनेक मंडळांनी ठाम भूमिका घेत, मिरवणुकीसाठी लवकरात लवकर मार्ग मोकळा करून देण्याची आग्रही मागणी लावून धरली आहे.
विशेष म्हणजे, मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुकीला दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्ण मार्गस्थ करावे, जेणेकरून उर्वरित मंडळांवरचा ताण कमी होईल, अशी प्रमुख भूमिका अनेक मंडळांकडून घेतली जात आहे. हा बदल कोणत्या स्वरूपात स्वीकारला जाईल, याकडे आता साऱ्या पुणेकरांचे लक्ष लागले आहे. गणेशोत्सवाचा विसर्जन दिवस फक्त धार्मिक उत्सव नसून, पुण्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि नियोजनशास्त्रीय क्षमतेचा कस पाहणारा क्षण ठरतो. यंदाच्या सुचना, बैठकीतल्या प्रस्ताव आणि मंडळांच्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनावरही एक नवा दबाव आला आहे. मंडळांचे म्हणणे स्पष्ट आहे कि , "सन्मान हवाच, पण न्यायही हवा!" प्रशासनाच्या उत्तरावरच यंदाचा विसर्जन मिरवणूक अनुभव सुखद होईल की वादळी, हे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.