ठाणे : मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून ४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताने ४ कुटुंबांनी घराचा आधार गमावला आहे. मृतांमध्ये ठाण्यामधील एका तरुणाचा समावेश आहे. या तरुणाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुंबई लोकलचा भयंकर अपघात झाला. मध्य रेल्वेवर दोन लोकलचे प्रवासी एकमेकांना धडकल्याने काही प्रवासी खाली पडले. या अपघातात एकूण १२ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. त्यातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. अनेकांनी लोकलमधील गर्दीमुळे अपघात झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या अपघातानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामध्ये ठाण्यातील एका ४४ वर्षीय आयटी इंजिनिअरचा मृत्यू झाला. मयूर शाह असं त्याचं नाव आहे. डोंबिवलीत स्वप्नातील घर घेण्यासाठी निघालेल्या मयूरचा हात घसरला आणि दुर्दैवी मृत्यू झाला.
मयूर शाह हा ठाण्याच्या घोडबंदर परिसरात त्याच्या आईसोबत राहायचा. त्याला दोन बहिणी असून दोघींचंही लग्न झालं आहे. मयूर शाह हा स्वतः अविवाहित होता. तो विद्याविहार या ठिकाणी नोकरी करायचा. त्याची डोंबिवलीत फ्लॅट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू होती. ज्याच्याकडून हा फ्लॅट खरेदी करायची होता तो मालक डोंबिवलीमध्ये राहत होता. त्यामुळे मयूर हा त्याला भेटण्यासाठीच डोंबिवलीला गेला असेल, असा अंदाज त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला.
या प्रकरणी मयूर शाहच्या मेहूण्यांनी, संतोष दोशी यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, 'मयूर हा ठाण्यामध्ये त्याच्या आईसोबत राहायचा. त्याचे वडील हे २२ वर्षांपूर्वीच वारले. तो विद्याविहारला कामाला होता. त्याला डोंबिवलीत घर घ्यायचं असल्याने तो कधीकधी घराच्या मालकाला डोंबिवलीत भेटायला जायचा. सकाळी तो त्यासाठीच गेला असेल आणि त्या दरम्यान हा अपघात झाला, या अपघाताची माहिती पोलिसांनी आम्हाला दिली'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.