अगदी अशीच धडकी भरवणारी घटना घडलीय देशाची आर्थिक राजधानी मुंबईत....दुपारची सव्वाबाराची वेळ... मुलुंडच्या एलबीएस रोडवर जॉन्सन अॅन्ड जॉन्सन चौकात नेहमीप्रमाणे गर्दी... मात्र याच दरम्यान ठाणे-वडाळा मेट्रो लाईनचा स्लॅब रस्त्यावरच्या धावत्या रिक्षा आणि कारवर कोसळला... आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
याच मेट्रोच्या निष्काळजीपणामुळे रिक्षाने प्रवास करणाऱ्या रामधन यादवचा जागीच मृत्यू झालाय.. तर 3 जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देताहेत..ही घटना घडल्यानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृताच्या नातेवाईकांची भेट घेतली... हा निव्वळ निष्काळजीपणा असल्याचा आरोप रितू तावडेंनी केलाय..
दुसरीकडे मेट्रोच्या कामात 54 ठिकाणी निष्काळजीपणा होत असल्याचं एमएमआरडीएच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कंत्राटदारावर कारवाई केली नसल्याचा आरोप भाजपचे स्थानिक आमदार मिहिर कोटेचा यानी केलाय..
खरंतर ठाणे ते वडाळा या मेट्रो लाईनचं काम सुरु असताना हा पहिलाच अपघात झाला असं नाही... तर या मार्गावर वारंवार अपघात झाल्याचं समोर आलंय..
18 नोव्हेंबर 2021 रोजी कापूरबावडीला काम सुरु असताना लोखंडी सळई कारवर कोसळली.. त्यात कारचा चुराडा झाला.. मात्र प्रवासी बालंबाल वाचले... त्यानंतर 29 मे 2023 ला मुलुंड ठाणे मेट्रोच्या कामावेळी मोठी क्रेन उलटल्याची घटना घडली.. त्यावेळी रस्त्यावर वर्दळ नसल्यानं दुर्घटना टळली... तर 9 जानेवारी 2024 ला कासारवडवळी भागात गर्डर बसवताना लोखंडी वस्तू खाली पडल्या.... त्यात सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला होता...
आता प्रश्न पडतो... की वारंवार मेट्रोच्या कामावेळी गंभीर दुर्घटना होऊनही सुरक्षा उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत.... शहराच्या विकासासाठी मेट्रो महत्वाची... मात्र मेट्रोचं काम नागरिकांच्या जीवावर उठणार असेल तर ते काय कामाचं... असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.... तर याच दुर्घटनेवर साम टीव्हीनेही काही सवाल उपस्थित केलेत...
मेट्रोचं काम सुरु असताना सुरक्षा उपाययोजना का केल्या नाहीत? रात्री बसवलेल्या गर्डरचा स्लॅब 24 तासांच्या आत कोसळतोच कसा? वारंवार होणाऱ्या अपघातातून धडा का घेतला जात नाही?कंत्राटदारावर आणि मेट्रो अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार का? मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का?
साम टीव्हीने मेट्रो दुर्घटनेवर सवाल उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोषींवर कारवाईचे आणि जिथं काम सुरु आहे त्याचं सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिलेत..
प्रत्येक घटना घडल्यानंतर जसे चौकशीचे आदेश दिले जातात तसे यावेळी ही दिले गेले आहेत. .. मात्र प्रत्येक दुर्घटनेनंतर चौकशीचं नाटक केलं जातं...अहवाल येतो.. मात्र उपाययोजना कागदावरच राहतात... आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या... असंच चित्र पाहायला मिळतंय... त्यामुळे आता प्रश्न अपघाताचा नाही तर मुंबईकरांच्या जगण्या-मरण्याचा आहे... हे लक्षात ठेवायला हवं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.