मीरा-भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरे गटाकडून मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी मोर्चापूर्वीच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर मराठी नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत मोठं आंदोलन केले. पोलिसांनी सोडल्यानंतर अविनाश जाधव यांनी थेट मीरारोड गाठले आणि आंदोलकांमध्ये सहभागी झाले. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत त्यांना इशारा दिला. 'महाराष्ट्रात कुठेही मराठी माणसासोबत काही घडलं तर असेच मोर्चे निघतील याची सरकारने दखल घ्यावी.', असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.
अविनाश जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारला आणि मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. त्यांनी सांगितले की, 'आपल्या कुणाला पकडले नसते आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता तर हा मोर्चा किमान ५० हजार लोकांचा झाला असता. अशीच एकजुट आपण मराठी माणसांसाठी दाखवूया. इथला एक आमदार नरेंद्र मेहता तो नेहमी सांगतो की मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणूस फक्त १२ ते १५ टक्के आहे. तेवढ्या टक्क्यावर आम्ही तुला पूरून उरू शकतो. आपली एकजुट कायम राहू द्या. मराठी माणसाच्या नादाला लागू नका. आपली एकजुट कायम ठेवूया. जिथे कुठे दबाव टाकण्यात येईल तिथे मराठी माणूस एक होईल. मराठी माणसाच्या नादाला कुणी लागेल त्याने लक्षात ठेवावे.' अशा शब्दात अविनाश जाधव यांनी इशारा दिला.
तसंच, 'मला रात्री जेव्हा उचलले तेव्हा जेवढं मी अवस्वस्थ झालो नव्हतो तेवढं मी इथे येताना अस्वस्थ होतो. जे काही मराठी माणसाने आज मीरारोड- भाईंदरमध्ये करून दाखवलं त्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. मी ज्या पोलिस स्टेशनला होतो त्या पोलिस स्टेशनचा प्रत्येक हवलदार टीव्हीवर हेच पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आंदोलन झाल्यानंतरचा आनंद मी पाहत होतो. तो एक सर्वसामान्य मराठी माणसाच्या चेहऱ्यावरील आनंद होता. हा आनंद महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने घेतला असेल. प्रत्येक घराघरात हे आंदोलन गेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही मराठी माणसासोबत काही घडलं तर असेच मोर्चे निघतील याची सरकारने दखल घ्यावी.' , असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
अविनाश जाधव यांनी पुढे सांगितले की,'वसई-विरार परिसरातील आमच्या मनसौनिकांना अटक करण्यात आली. त्यानंतर लोकं रस्त्यावर उतरली. आमच्या लोकांना गाडीतून घेऊन जात होते. उचलू उचलू गाडीत भरत होते. आम्ही काय दहशतवादी आहोत का? मीरा- भाईंदर हे महाराष्ट्रात आहे की राजस्थान आणि गुजरातमध्ये आहे. मीरा -भाईंदर हे महाराष्ट्रात असल्यास मराठी माणसाला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे.' तसंच, 'नरेंद्र मेहता या माणसामुळे हा मोर्चा निघाला. त्याने ३० ते ४० सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल केला. या सगळ्याची जबाबदारी त्या माणसाची आहे. इथला मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. मराठी माणसाला कमजोर समजू नका. या महाराष्ट्राचा इतिहास मोठा आहे. आम्ही उपाशी मरणार नाही. आम्ही ठरवले तर तुम्ही उपाशी मराल.', असा इशारा अविनाश जाधव यांनी गुजराती लोकांना दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.