म्हाडाच्या नवीन घरांची दिवाळीतील सोडत पुढे ढकलली गेली.
पत्राचाळ पुनर्विकासातील २५०० घरे अजूनही अपूर्ण असून परवानग्या प्रलंबित आहेत.
दिवाळीत अर्ज प्रक्रिया सुरू होणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
अर्जदारांचा हिरमोड झाला असून सर्वजण अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने येत्या दिवाळीत ५००० हजार घरांची सोडत काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता या दिवाळीत सर्वसामान्यांच्या मुंबईत घर घेण्याच्या स्वप्नाला ब्रेक लागला आहे. म्हाडाने पुरेशी घर नसल्याने ही सोडत पुढे ढकलली आहे. त्यामुळे घर घेण्यास इच्छुक असणाऱ्या सर्वसामन्यांचा हिरमोड झाला आहे.
मुंबईत घरांच्या किंमती सतत वाढत आहेत. साध्या घरासाठीदेखील कोट्यवधी रुपयांची गरज भासते. अशा परिस्थितीत परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देणारा म्हाडा हा सर्वसामान्यांसाठी मोठा आधार ठरतो. त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या सोडतीला नेहमीच प्रचंड प्रतिसाद मिळतो.
मुंबई मंडळाच्या सोडतीचा इतिहास पाहिला तर २००७ पासून २०१९ पर्यंत सलग दरवर्षी घरांची सोडत काढण्यात आली होती. मात्र २०२० ते २०२२ दरम्यान कोरोनाच्या काळात ही मालिका खंडित झाली. त्या काळात घरे उपलब्ध नसणे, प्रकल्पांच्या कामांमध्ये झालेला विलंब आणि आर्थिक अडचणी या कारणांमुळे म्हाडाला सोडत काढता आली नाही. त्यानंतर २०२३ आणि २०२४ मध्ये मुंबई मंडळाने सोडती जाहीर केली आणि अर्जदारांकडून प्रचंड प्रतिसादही मिळाला.
यंदा २०२५ मध्ये सोडतीची घोषणा एप्रिल महिन्यातच करण्यात आली होती. दिवाळीच्या सुमारास तब्बल पाच हजार घरांची सोडत होईल, अशी खात्री मंडळाने दिली होती. विशेष म्हणजे या सोडतीत पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील सुमारे २५०० घरांचा समावेश करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र या घरांच्या प्रत्यक्ष कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही.
याशिवाय इतर प्रकल्पांमधूनही पुरेशी घरे सोडतीसाठी उपलब्ध नाहीत. म्हाडाकडून वेळोवेळी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र प्रकल्प सुरू होण्यात होणारा विलंब, तांत्रिक अडचणी आणि परवानग्यांमधील विलंब यामुळे सोडतीवर परिणाम होत आहे. सध्या मुंबई मंडळातील अधिकारी संभाव्य घरांची शोधाशोध करत आहेत, मात्र दिवाळी अगदी काही दिवसांवर आली असताना कोणतीही अधिकृत घोषणा किंवा अर्ज प्रक्रियेची सुरुवात झाली नसल्याने अर्जदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे दिवाळीत पाच हजार घरांची सोडत प्रत्यक्षात काढली जाणार की नाही, याबाबत अद्याप अनिश्चिततेचे वातावरण आहे. दरम्यान यंदाच्या दिवाळीत म्हाडा सोडत काढणार का, की हा मुहूर्त हुकणार, हा प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे. हजारो अर्जदार या सोडतीकडे डोळे लावून बसले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.