महाराष्ट्र सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत पीककर्ज माफी जाहीर केली
३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकीदार शेतकरी योजनेस पात्र असतील
कर्जमाफी फक्त पीककर्जासाठी लागू असणार
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळण्याची शक्यता
काही दिवसांपूर्वी अधिवेशनात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट जाहीर केलं. राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असल्याची घोषणा केली. सरकारने राज्यातील मागील वर्षातील म्हणजेच २०२५ मधील ३० सप्टेंबर रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली. कर्जमाफीची रक्कम पीककर्जाची असणार आहे. पीककर्ज परतफेडीचा सर्वसाधारण कालावधी ३० जून असतो. त्यापूर्वी कर्जमाफीचे निकष अंतिम होऊन पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी दोन लाख रुपयांची असून ती पीककर्जापुरतीच मर्यादित आहे.
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात २४ हजार शेतकरी थकबाकीत आहेत. त्यांच्याकडे ३६२ कोटींची थकबाकी आहे. मात्र, त्यात पीककर्जासह दिर्घ व मध्यम मुदतीची रक्कम अधिक आहे. दुसरीकडे ९० हजार शेतकरी नियमित कर्जदार आहेत. दरम्यान ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ज्या शेतकऱ्याकडे बॅंकेचे शेतीसंबंधित कोणतेही कर्ज थकलेले नाही, त्यांनाच ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
मात्र, ५० हजारांपेक्षा कमी पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार का, हे अनुत्तरित आहे. पूर्वीच्याच कर्जमाफीचे बहुतेक निकष या कर्जमाफीसाठी असणार आहेत. मात्र, दिर्घकालिन उपाययोजनांच्या अनुषंगाने या कर्जमाफीचे काही विशेष निकष देखील असणार आहेत. पुढील एक ते दीड महिन्यात निकष जाहीर होतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
तीन लाख रुपयांपर्यंत पीककर्ज बिनव्याजी मिळत असल्याने चार एकरांवरील बहुतेक शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले आहे. त्यांना वरील एक लाख रुपये भरावे लागतील, त्यानंतर त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.