कल्याण-डोंबिवलीकरांवर पाणी संकट
३० जून आणि ७ जुलै रोजी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार
धरणांतील अपुरा पाणीसाठा लक्षात घेऊन २० टक्के पाणी कपातीचा निर्णय
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
कल्याण डोंबिवलीकरांसाठी मोठी बातमी! येत्या ३० जून आणि ७ जुलै रोजी २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रातील नागरिकांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने धरण क्षेत्रातील अपुरा पाणीसाठा आणि पावसाळा लांबण्याची शक्यता लक्षात घेता २० टक्के पाणी कपातीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्याने यंदा अल निनोमुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार जलसंपदा विभाग आणि संबंधित यंत्रणांनी विविध महानगरपालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) तसेच इतर प्राधिकरणांना दररोज २० टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयाची अंमलबजावणी करताना केडीएमसीच्या बारावे, मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रांमधून होणारा पाणीपुरवठा मंगळवार, ३० जून २०२६ आणि मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी पूर्णपणे बंद राहणार आहे. सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून ते मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत सलग २४ तास पाणीपुरवठा खंडित राहील.
महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना या काळात आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, पाणीपुरवठा बंद असलेल्या दिवशी तसेच त्यानंतरच्या दिवशी टँकरद्वारेही पाणीपुरवठा केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध साठ्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.