इस्त्रायल-इराण युद्धाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागला.
व्यावसायिक गॅसचा पुरवठा २० टक्क्यांनी कमी
गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील सुमारे २० टक्के हॉटेल बंद
इस्त्रायल-इराण युद्धाची झळ भारतासहित महाराष्ट्रालाही बसू लागली आहे. युद्धामुळे गॅसच्या पुरठवड्यात तुटवड्यात जाणवू लागला आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा २० टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. त्याचा थेट परिणाम हॉटेल रेस्टॉरंटच्या व्यवसायावर झाला आहे. गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील २० टक्के हॉटेल बंद झाले आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात युद्धाची झळ बसत असल्याचे दिसत आहे.
मुंबईत २० टक्के हॉटेल बंद
युद्धामुळे गॅस पुरवठ्याच्या तुटवड्याचा फटका काही मुंबईकरांना बसताना दिसत आहे. गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील २० टक्के हॉटेल बंद झाले आहेत. पुढील दोन-तीन दिवस गॅस पुरवठ्यांचा तुटवडा कायम राहिल्यास, ५० टक्के हॉटेल बंद होणार असल्याचा दावा केला जात आहे.
पुण्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा
मुंबईसह पु्ण्यातही हॉटेल व्यावसायिकांना गॅस तुटवडा जावणत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर देणे मोठ्या प्रमाणात कमी केलं आहे. गेल्या चार दिवसांपासून पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. अत्यावश्यक ठिकाणी १० टक्के व्यावसायिक सिलिंडर देण्यात येत आहे. हॉटेल व्यावसायिकांवर मोठा परिणाम व्हायला सुरवात झाली आहे.
नाशिकलाही फटका
युद्धाचा फटका आता थेट उद्योग क्षेत्राला बसू लागला आहे. गॅस टंचाईने नाशिकमधील उद्योग अडचणीत आले आहेत. ४०० हून अधिक कंपन्या बंद पडण्याच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे राजेंद्र पानसरे यांनी केला आहे. अनेक कंपन्यांकडे फक्त उरला १ दिवसाचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे पुरवठा न झाल्यास कंपन्या बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते. कंपन्या बंद झाल्यास उद्योग जगताला कोट्यावधींचा फटका बसण्याची शक्यता आहे.
ठाण्यात एचपी गॅस सिलिंडरचा तुटवडा
ठाणे महानगरपालिकेच्या परिसरात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागलाय. कळवा शहरातील सुमारे ४५ हजार घरांमध्ये एचपी गॅसचा पुरवठा केला जातोय. मात्र सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळत आहे.
जळगाव सिलिंडरच्या गोदामाजवळ गर्दी
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शहरात घरगुती गॅस सिलेंडरच्या गोदामावर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांनी गोदामाकडे गर्दी होत आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा लवकर सुरळीत करून नागरिकांना तातडीने सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत,अशी मागणी करण्यात येत आहे.
यवतमाळमध्ये हॉटेलमधील गॅस सिलिंडर संपला, लाकडाची भट्टी पेटवली
अमेरिका, इस्त्रायल आणि इराण या देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका संपूर्ण जगासह राज्याला बसू लागला आहे. यवतमाळमध्ये हॉटेल व्यावसायिकांना तीन दिवसांपासून व्यवसायिक गॅस पुरवठा बंद केला आहे. यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ व्यावसायिकांवर आलीये. गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर काही हॉटेलमध्ये लाकडाची भट्टी पेटवण्यात आली आहे.
धाराशिवमध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा बंद
अमेरिका इराण युद्धाचा परिणाम धाराशिवमध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाला आहे. जिल्ह्यात भारत आणि एचपी गॅस कंपनीच्या प्रमुख गॅस वितरण केंद्रावरून गॅस पुरवठा बंद झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरबाबत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केल्याची पुरवठा विभागाची माहिती आहे. हॉस्पिटल,शैक्षणिक संकुल यांनाच गॅस पुरवठा करा, अशा सूचना पुरवठादारांना दिल्या आहेत. तसेच गॅस साठा करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
हॉटेल चालकाकडून चुलीवर स्वयंपाक
अमेरिका,इराण,इराक या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका धुळ्याच्या शिरपूर येथील हॉटेल व्यावसायिकांना बसत असल्याचे दिसून येत आहे. या युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. हॉटेल व्यावसायिकांना गॅसचा पुरवठा कालपासून बंद करण्यात आल्यामुळे हॉटेल व्यवसायासाठी आवश्यक असलेला गॅस सिलिंडर मिळेना झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे.
सोलापुरातही गॅस तुटवडा
सोलापुरातही गॅसचा तुटवडा आणि वाढलेले दर याचा फटका हॉटेल व्यवसायिकांना बसत आहे. गॅसचा तुटवडा आणि तेलाच्या किमती वाढल्याने आध्यात्मिक पर्यटन असलेल्या केंद्र असलेल्या सोलापूर जिल्ह्यावर परिणाम झाला आहे. गॅसचा तुटवडा होत असल्याने व्यावसायिकांना हॉटेल बंद करावे लागणार आहे. सतराशे ते अठराशे रुपयांना मिळणारा व्यावसायिक गॅस सिलिंडर आता तेवीसशे ते चोवीसशे रुपयांवर पोहोचला आहे.
अमरावतीमध्ये गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा
इस्त्रायल- इराण युद्धाचा फटका आता भारतातील नागरिकांनाही बसताना दिसत आहे. अमरावती शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. शहरात गॅस एजन्सींना कमी प्रमाणात सिलिंडर पुरवठा होत असल्याने ग्राहकांना वेळेवर सिलेंडर घरी पोहोचत नसल्याने ग्राहक थेट आता गॅस एजन्सीसमोरच सिलिंडर घेऊन मागणी करत आहे.सिलिंडरसाठी ग्राहकाने मोठ्या प्रमाणात रांग लावल्याचे चित्र सध्या अमरावती शहरात आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने ग्राहकांची मात्र तारांबळ उडत आहे, या सोबतच गॅस एजन्सीधारकांनाही ग्राहकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.