सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी
मुंबई : कोल्हापुरातील विशाळगडासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने विशाळगडाबाबत मोठा निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने विशाळगडावरील कारवाईला तुर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळे या परिसरातील स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील काही दिवसांपासून विशाळगडावरील कारवाईवरून वाद पेटला आहे. या कारवाईवरून अनेक आंदोलनेही झाली. त्यानंतर विशाळगडावरील अतिक्रमणावर कारवाई सुरु झाली होती. विशालगडावरल कारवाईला वेग आला होता. यामुळे स्थानिक आणि विविध संघटना असा वाद पेटला होता. मात्र, स्थानिकांच्या विरोधानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं होतं.
या प्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणीत कोर्टाने अतिक्रमणाच्या कारवाईला स्थगिती दिली. या विशाळगड प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाने अनेक सवाल राज्य सरकारला केला. ऐन पावसाळ्यात विशाळगडावरील बांधकामावर हातोडा का चालला, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे.
याचिकाकर्त्याने हायकोर्टात त्या दिवशी झालेल्या तोडफोडीचे व्हिडिओ कोर्टात सादर केले. घोषणाबाजी करत काही लोकांनी तोडफोड करत असल्याचं व्हिडिओतून स्पष्ट होत असल्याचा याचिकाकर्त्याचा आरोप आहे. तिथं उपस्थित अधिकाऱ्यांनीच जमावाला मोकळीक दिल्याचा आरोप स्थानिकांनी याचिकेतून करण्यात आला आहे.
विशाळगडावर तोडफोड होत असताना सरकार काय करत होतं? कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची? असा सवाल देखील मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सवाल केले आहेत.
पावसाळ्यात सुरु असलेली ही कारवाई तात्काळ थांबवा, सप्टेंबरपर्यंत कुठलीही नवी तोडफोडीची कारवाई नको, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाने विशाळगडवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या मुख्य अधिकाऱ्याला उच्च न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश जारी केले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.