मनोज जयस्वाल
वाशीम : वाशिम जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र करडा येथून खरेदी केलेल्या लिंबाच्या रोपांना ईडलिंबू लागल्याचा प्रकार समोर आला होता. यात तपासणी केली असता कृषी विभागाच्या चौकशी समितीच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. अर्थात कृषी केंद्राकडूनच शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून पीडित शेतकऱ्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कुपटा येथील शेतकरी विजय देशमुख यांना आपल्या शेतात लिंबाची लागवड करायची होती. याकरिता त्यांनी पाच वर्षांपूर्वी कृषी विज्ञान केंद्र करडा यांच्याकडून साई सरबती जातीच्या लिंबाची ३८५ रोपं विकत घेतली होती. पाच वर्ष संगोपन केल्यानंतर यंदा प्रथमच या रोपांना फळधारणा होण्यास सुरवात झाली. मात्र फळधारणा झाली तेव्हा ही लिंबू नसून ईडलिंबू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
कृषी विभागाकडून चौकशी समिती
हा प्रकार समोर आल्यानंतर शेतकऱ्याने कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राकडे तक्रार केली होती. त्यानंतर कृषी विभागाकडून यासंदर्भात एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने पाहणी करत बागेची तपासणी केली. याचा अहवाल नुकताच आला असून या अहवालात ही रोप ईडलिंबूचीच असल्याचा प्रकार समोर आला आहे.
पाच ते सहा लाखांचा खर्च
विजय देशमुख यांनी आपल्या शेतात दोन एकर क्षेत्रावर या लिंबाच्या बागेची लागवड केली होती. पाच ते सहा लाख रुपये खर्च करून मोठ्या मेहनतीने पाच वर्ष त्यांनी ही बाग सांभाळली आणि झाड मोठी केली. मात्र आता या झाडांना ईडलिंबूची फळ लागत असल्यानं देशमुख यांना मोठा धक्का बसलाय. या बागेसाठी आजवर झालेला खर्च आणि भविष्यात २० ते २५ वर्ष या बागेतून येणारं उत्पादन लक्षात घेऊन कृषी विज्ञान केंद्रानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देशमुख यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.