पराग ढोबळे
नागपूर : अक्षय तृतीयेला काही ठिकाणी अल्पवयीन मुलींचे विवाह करण्यात येत असतात. अशाच प्रकारे नागपूर जिल्ह्यातील डोंगरगाव व कन्हान याठिकाणी नियोजित असलेले दोन बालविवाह रोखण्यात आले आहेत. हळद लागून विवाह सोहळ्याची तयारी सुरु होती. अक्षदा पडण्यापूर्वीच जिल्हा बाल संरक्षण पथकाने कारवाई करत विवाह रोखले आहेत. तसेच या प्रकरणी सर्वाना नोटीस बजावण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील डोंगरगाव आणि कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत सदरची कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी अल्पवयीन मुलीचा विवाह अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणार होता. याची माहिती जिल्हा बाल संरक्षण पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने विवाहस्थळी जात बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार बालविवाह थांबवण्याची कारवाई केली. डोंगरगाव येथील मुलीचे वय १५ तर कन्हान येथील मुलीचे वय १७ वर्षाचे असल्याचे कागदपत्रांच्या तपासणीत समोर आले.
नातेवाईकांनी घातला गोंधळ
दरम्यान जिल्हा बाल संरक्षण पथक पोहोचण्यापूर्वी दोन्ही ठिकाणच्या लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. पथक धडकताच यावेळी मुला- मुलीच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने पोलिसांना बोलाविले होते. यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले.
सर्वाना बजावली नोटीस
तसेच बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती सोबतच कायद्याची भीती गरजेचे असल्या कारणाने या कारवाईत मंडप डेकोरेशन, आचारी आणि डीजे चालकालाही नोटीस बजावण्यात आली. तसेच यापुढे कुठल्याही लग्नाची ऑर्डर घेताना मुलीचे वय तपासून घेतल्यावरच ऑर्डर घ्यावी; अन्यथा एक लाख रुपयाचा दंड करण्यात येईल असे नोटिसीत म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.