Vijaysingh Deshmukh Removed as Annasaheb Patil Corporation MD : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (MD) विजयसिंह देशमुख यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजातील तरुण उद्योजकांच्या तीव्र नाराजीची आणि तक्रारींची दखल घेत मुख्यमंत्र्यांकडे केलेली मागणी अखेर मान्य झाली आहे. विजयसिंह देशमुख यांच्या जागी आता राज्य सरकारने अविनाश रणखांब यांची नवीन एमडी म्हणून नियुक्ती केली आहे.
मराठा तरुणांची नाराजी अन् अध्यक्ष नरेंद्र पाटलांचा दौरा
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या अनेक मराठा तरुणांचे मंजूर झालेले 'क्रेडिट लिंक्ड सबसिडी' किंवा कर्ज मंजुरीचे एलओआय (LOI) अचानक रद्द केले जात होते. त्यामुळे तरुण उद्योजकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नुकताच राज्यातील पाच जिल्ह्यांचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान अनेक तरुणांनी एमडी विजयसिंह देशमुख यांच्या मनमानी कारभाराबद्दल थेट नरेंद्र पाटील यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला होता.
'मराठाद्वेषी अधिकारी' म्हणून झाली होती टीका
तरुणांच्या तक्रारींनंतर नरेंद्र पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन या समस्येकडे लक्ष वेधले होते. तसेच, विजयसिंह देशमुख हे 'मराठाद्वेषी अधिकारी' असल्याचा थेट आरोप करत, त्यांच्या कारभारामुळे मराठा समाजातील नवउद्योजकांचे मोठे नुकसान होत असल्याची टीका पाटील यांनी केली होती. या सर्व परिस्थितीचा सविस्तर अहवाल अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला होता.
मुख्यमंत्र्यांची तातडीने कारवाई; अविनाश रणखांब नवे एमडी
मराठा समाजातील तरुणांचा वाढता रोष आणि अध्यक्षांनी दिलेला अहवाल गांभीर्याने घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयसिंह देशमुख यांची पदावरून तातडीने हकालपट्टी केली. त्यांच्या जागी आता अविनाश रणखांब यांच्याकडे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. या निर्णयामुळे महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यास उत्सुक असलेल्या मराठा नवउद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप
एमडींच्या हकालपट्टीनंतर महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी विजयसिंह देशमुख यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र पाटील म्हणाले, मागील वर्षापासून एमडी विजयसिंह देशमुख हे मराठा समाजासाठी सातत्याने अडथळे निर्माण करत होते. याचा थेट फटका मूळ लाभार्थ्यांना बसत होता. सरकार आणि मराठा समाजामध्ये अंतर निर्माण व्हावे आणि सरकारच्या विरोधात मराठ्यांच्या मनात द्वेष निर्माण व्हावा, याच उद्देशाने त्यांनी काम केले. शासनाचा नियम उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रुपये ठेवण्याचा आहे; परंतु एमडी देशमुखांनी स्वतःच्या अधिकारात ६ लाखांची अट टाकली. इतकेच नाही तर महामंडळाच्या अनेक मंजूर झालेल्या तरुणांचे 'एलओआय' (LOI) अचानक रद्द केले आणि चालू असलेले लाभ बंद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.