आंबेनळी घाटात भीषण अपघात
भरधाव कार दरीत कोसळली
अपघातामध्ये ८ तरुणांचा मृत्यू
हे आठही तरुण साताऱ्याचे होते
सहलीसाठी कोकणात गेलेल्या 8 तरुणांचा महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात दरीत कोसळून जागीच मृत्यू झालाय. मात्र 24 तास उलटूनही प्रशासनाला या अपघाताचा पत्ता लागला नाही. या घाटात वारंवार अपघात होऊनही संरक्षित भिंत बांधण्याकडे प्रशासनानं लक्ष दिलं नाही. त्यामुळे आंबेनळी घाट मृत्यूचा कसा सापळा ठरतोय ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
आंबेनळी घाटात रात्रीच्या अंधारात एक अनियंत्रित स्कॉर्पिओ गाडी तब्बल 1800 फूट खोल दरीत कोसळली. वीकेंड साजरा करण्यासाठी 22 मे ला दापोलीजवळील हर्णे बीचवर हे तरुण ट्रीपवर गेले होते. मात्र कोकणातील ही ट्रीप या आठही तरुणांसाठी अखेरची ठरली. या अपघातात महेश पवार, आदित्य साळुंखे, रितेश लोखंडे, सुहास लोखंडे, अंश चव्हाण, उत्कर्ष शिंगटे, अनिल शिंगटे, नितीन नायकोंडे यांचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातात साताऱ्यातील आसगाव येथील 5 तरुणांचा मृत्यू झालाय.
दरम्यान आंबेनळी घाटातील अपघातात बराच वेळ स्कॉर्पिओ कोसळल्याचा कुणालाच थांगपत्ता नव्हता. मात्र कुटुंबियांनी मुलं घरी न परतल्यानं शोधाशोध सुरु केली आणि त्यानंतर प्रशासनाला अपघाताची माहिती मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तसचं घाटात संरक्षित भिंती नसल्यानं अपघात झाल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबियांनी आणि स्थानिकांनी केलाय.
आंबेनळी घाटात यापूर्वीही अनेक भीषण अपघात झालेत आणि त्यात अनेकांचे प्राण गेलेत. तुम्ही पाहू शकता. याचं तुटलेल्या बॅरिगेट्स आणि नादुरुस्त संरक्षित भिंतींमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतोय. मात्र तरीही प्रशासन ढिम्म आहे. अशावेळी सुरक्षा कठड्यांअभावी अजून किती जणांचे बळी जाणार? असा सवाल उपस्थित होतोय. सरकारने आता तरी या धोकादायक घाटांचे ऑडिट करावं आणि पीडित कुटुंबांना तात्काळ मदत जाहीर करावी, हीच अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जातेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.