Tenth day of fasting of Tinasmal Villagers for basic rights and rehabilitation  दिनू गावित
महाराष्ट्र

तिनसमाळ एक गाव! मूलभूत हक्कांसाठी; पुनर्वसनासाठी गावकऱ्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षात आजही देशातील अनेक खेडीपाडी मुलभुत सुविधांपासुन वंचीत आहे. यातलच एक गाव म्हणजे नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात वसलेले तिनसमाळ गाव. (Tinasmal Village, Nandurbar) या गावात आजही पाणी, शिक्षण, वीज, रस्ता अशांचा अभाव असल्याने इंग्रजांच्या काळ्यापाण्याची शिक्षा बरी असे म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. तब्बल २० वर्षांपासून पुर्नवसानाचे भीजत घोंगड पडल्याने सोयी-सुविधांपासून कोसो दूर अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या गावाची दुर्दशा झाली आहे. गावाचे पुनर्वसन (Rehabilitation) करा किंवा मूलभूत सुविधा द्या अशी गावकऱ्यांची मागणी आहे. यासाठी गावकऱ्यांंचं गावातचं गेल्या दहा दिवसांपासून आमरण उपोषण सरु आहे. (Tenth day of fasting of Tinasmal Villagers for basic rights and rehabilitation)

हे देखील पहा -

धडगावपासून पंधरा ते वीस किलो मीटरचा डोंगर दऱ्यातला अतिशय खडतर आणि जीवघेणा प्रवास करुन जावं लागत असलेलं नर्मदा काठावरील अतिदुर्गम भागात वसलेले तीनसमळा गाव. एक तर मूलभूत सुविधा मिळाव्यात किंवा गावाचे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी गावकऱ्यांनी आपल्या गावातच आमरण उपोषण (Fast unto death) सुरू केले आहे. आज उपोषणाचा दहावा दिवस आहे. तीनसमाळचे ग्रामस्थ गेली पंच्याहत्तर वर्षे शासनाच्या सोयी-सुविधाच पोहचत नसल्यानं मरणयातना भोगत आहे. तेरा हजार हेक्टर जंगलामध्ये जवळपास दहा किलो मीटरच्या परिसरात तीनसमळाचे ६०२ लोक विखुरलेल्या पाड्यांवर राहत आहेत. या तीनसमाळच्या आजू-बाजूची गावं सरदार सरोवरामुळे बुडीत क्षेत्रात गेल्याने या भागात शिल्लक राहीलेले हे गाव आणि त्याच्या व्यथा बरंच काही सांगून जातात.

गावात गेल्या वीस वर्षांत तब्बल चार जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करत गावच्या पुर्नवसनाचा अहवाल दिला. मात्र कागदी घोडे नाचवण्यापलीकडे पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लागतच नसल्याने इतर विभागही या ठिकाणी सोई सुविधा पोहचवण्यात कुचराई करत आहे. त्यामळेच हे गाव आजही रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, रोजगार अशा मूलभूत सुविधांपासून खऱ्या अर्थाने कोसो दूर आहे. गावात दोन वर्षांपुर्वी वीज आली आणि शासनाच्या कागदावर या गावचं विद्युतीकरण झालं. मात्र आजही गावातील निम्याहुन अधिक घरे अंधारतच आहेत. वीज आल्यानंतर जेमतेम महिना दोन महिना वीज पुरवठा मिळाला, त्यांनंतर मात्र अंधारमय जीवन. मात्र शासन दरबारी हे गाव विद्युतीकरण झाल्याने गावकऱ्यांची एक प्रकारे थट्टाच सुरु आहे. पाचवी पर्यंतची शाळा आहे, ती पण एकाच पाड्यावर त्यामुळे एका पाड्यावरुन शाळा गाठण्यासाठी यातील विद्यार्थ्यांना दहा किलोमीटरची पायपीट करावी लागते त्यामुळे शाळा असूनही उपोयग नाही. बरं या तीनसमाळच्या जंगलात आजू-बाजूला खेडी नसल्याने वाघ आणि बिबट्याचा वावर थेट गावात होतो. कधी गावातील माणसं तर कधी पाळीव प्राणी यांचा शिकार होतो. त्यामुळे गावातल्या जेमतेम दिडशे कुटुंबांच्या पुनर्वसनासाठीच हे गाव आग्रही आहे आणि त्यामुळेच गावातील ४० जण गेल्या सहा दिवसांपासुन आमरण उपोषण करत असुन अख्खं गाव साखळी उपोषण करत आहे. या गावच्या पुर्नवसनासाठी झटणारे तानाजी पावरा या गावातील व्यथा सांगतांना चांगलेच व्यथित होताना दिसून येतात.

तिनसमाळ गावातील गावकऱ्यांचं साखळी उपोषण

सर्वात भीषण त्रास म्हणजे या ठिकाणच्या पाण्याचा प्रश्न. जगण्यासाठी थेंब-थेंब पाण्यासाठी या ठिकाणच्या महिला आणि पुरुषांना अतिशय विदारक परिस्थीतीला सामोरे जावे लागत आहे. खडकाळ भागात वसलेल्या या गावातील हॅन्डपंपाना पाणीच नाही. दुसरीकडे दीड-दोन किलोमीटरवर सरदार सरोवर प्रकल्पाचं नर्मदा नदीचे बॅक वॉटर गावकऱ्यांना मृगजळासारखे भुरळ घालते. त्यामुळे धरण तोंडाशी असूनही गावकऱ्यांची तहान मात्र भागत नाही. या गावातील महिलांना, मुलींना हंडाभर पाण्यासाठी जंगलातून डोंगरदऱ्यांतून जीवघेणा प्रवास करुन गाव झऱ्यातून पाणी भरुन पाच ते सहा किलोमीटरची पायपीट करुन पाणी आणावे लागते. कधी पाय निसटला तर थेट दरीत जाण्याची भीती तर आहेच शिवाय परिसरातील वाघ बिबट्यांच्या हल्ल्याची भिती त्यामुळे पाण्याची दुर्भीक्षता सोसणाऱ्या या गावातील महिलांची पाण्यासाठीची ही कसरत खऱ्या अर्थाने प्रगतशील महाराष्ट्राचे वाभाडे काढते. हो विशेष म्हणजे गावात जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने लाखो रुपये खर्च करुन पाणी पुरवठा योजना देखील राबविली आहे. मात्र त्याला थेंबभर पाणीही नाही. त्यामुळे हे सारे पैसे ठेकेदारांच्या तुमड्या भरण्यात वाया गेल्याचे चित्र आहे.

तिनसमाळ गावातील रस्त्यांची दुर्दशा

या गावाचा फेरफटका मारल्यानंतर गावाच्या खऱ्या स्थितीचा साऱ्यांनाच आवाका येईल. गाव म्हटलं तर शेती हा सर्वात प्रमुख व्यवसाय. या ठिकाणच्या शेतकऱ्यांकडे दहा-दहा एकर शेती तर आहे. मात्र शेतीची प्रत (पोत) पाहिली तर मग समजलं याठिकाणी शेती कशी होत असेल. या गावातल्या शेतात माती कमी आणि दगडच जास्त आहे. काळ्या आईच्या कुशीत दगडांचा हा फैललेला सागर खऱ्या अर्थानं या ठिकाणच्या शेतीसाठी मोठ्या अडचणीचा विषय ठरला आहे. दहा एकरमधून वर्षाकाठी जेमतेम क्विंट-दोन क्विंटल ज्वारीचे उत्पन्न याठिकाणच्या ग्रामस्थांना मिळत आहे. अनेक कृषी तज्ञांनी याठिकाणच्या शेतीची पाहणी केली. मात्र हे सारे चित्र बदलण्यासाठी शासनाच्या निकषांपेक्षाही अधिकचा निधी लागणार असल्याने याबाबत कोणतीही योजना राबविण्यासाठीचे कुचराई करत आहे.

गावकऱ्यांचं साखळी उपोषण

गावात वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधांचा वाणवा. त्यातच इथल्या खडतर जीवनमान आणि वन भौगोलिक परिस्थीतमुळे जीवाचा धोका असल्याने याठिकाणी सर्वात मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे, तो या गावातील युवकांच्या लग्नाचा. या गावातील युवकांचे लग्न होत नसल्याची अजब-गजब बाब समोर आली आहे. या गावातील हाल अपेष्टा पाहून आजू-बाजूच्या खेड्यातील लोक या गावात आपल्या मुलींना देतच नाही. त्यामुळे आपली मनपसंद मुलगी भेटत नसल्याची युवकांना खंत आहे. गावातील ७० टक्के मुलं अविवाहीत आहे. याच गावच्या अन्य अतिदुर्गम पाड्यातील मुली असो, वा नाडल्या पडलेल्या मुलीच आमच्या नशीबी असल्याचा दावा युवक करत आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या मुली या गावात लग्न करुन आल्या त्यांच्यामध्ये देखील गावातील असुविधांमुळे कमालीची नाराजी आहे. यातली एक म्हणजे खुशी पावरा. घरच्या चुल्ह्यापुरती मर्यादीत झालेली खुशी पावरा उच्च शिक्षीत तरुणी आहे. डीएमएलटीचे शिक्षण घेतलेली खुशी पावरा ही जर आपल लग्न इतर गावात झालं असत तर आपल्याला शिक्षणानारुप नोकरी मिळाली असती असे आवर्जुन सांगते. मात्र या गावात लग्न करुन आलेल्या हालअपेष्टा पाहता लग्नासाठी या गावातील वर निवडल्याचे पश्चाताप होत असल्याचे ती निडरपणे सांगते. मात्र तिच्या या वेदनांना शासकीय अनास्था तितकीच जबाबदार आहे.

प्रशासनाकडून या गावाची काय थट्टासुरु आहे. याची प्रचिती या गावच्या ग्रामपंचायतीच्या अंतरावरुन येईल. तीनसमाळ हे गाव रोषमाळ खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीला जोडलं आहे. काही कागदांसाठी आवश्यक दाखल्यांसाठी, योजनांसाठी ग्रामपंचायत गाठायची तर गावकऱ्यांना थोडा थाडका नव्हे तर, तब्बल ३५ किलो मीटरचा प्रवास करावा लागतो. दुसरीकडे काही वैद्यकीय त्रास जाणवल्यास आरोग्य केंद्रही २५ किलोमीटर दूर. गावात आरोग्य उपकेंद्र आहे, मात्र यातील कर्मचारी आठवडा दोन आठवड्यातून एकदा उगवले तर नवलंच. बरं गावाला पंतप्रधान ग्रामीण सडक योजनतून रस्ता मजुर झाला. त्यासाठी कोट्यावधींची उधळणदेखील झाली. मात्र रस्त्याची अशी अवस्था पाहून आपण याला रस्ता म्हणावा का असा प्रश्न याठिकाणाहून प्रवास केलेल्या प्रत्येकालाच येईल. त्यामुळे शासनाची खाबुगीरी कुठपर्यंत असावी असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित करत आहे.

या सर्व भौगोलीक परिस्थीतीचा आणि याठिकाणी सर्व सामान्यांवर आणण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांवर येणाऱ्या खुर्चाची गोळा बेरीज केल्यास या गावातील जेमतेम दिडशे कुटुंबाच पुर्नवसन हाच योग्य पर्याय असल्याचे काही शासकीय अधिकारी खाजगीत सांगतात. विशेष म्हणजे तीन वर्षांपुर्वी शासन दरबारी या गावच्या पुर्नवसनचा प्रस्ताव देखील गेला असून हा सर्व वरिष्ठ पातळीवरचा प्रश्न असल्याने जिल्ह्यातील स्थानिक यंत्रनणादेखील या गावच्या साऱ्या प्रश्नांवर निष्क्रिय ठरत आहे. याबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अ‌ॅड. के. सी. पाडवी यांना विचारले असता त्यांनी गावकऱ्यांची मागणी रास्त आहे त्याठिकाणी असलेल्या समस्या गंभीर आहे. पुनर्वसनाचा प्रश्न शासनदरबारी मार्गी लावणार असल्याचे वक्तव्य केलं आहे.

नर्मदा सरोवरामुळे अनेक गांवाचे विस्थापन झाले खरे, मात्र बुडीत क्षेत्रात नसणाऱ्या पण अतिदुर्गम भागात वसलेल्या तीनसमाळा सारखं एखादं गाव आजही विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे. जर गावात मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी स्वातत्र्यानंतर पंच्चाहतर वर्षे उजाडत असतील आणि त्याहीसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर हे गाव या भारतात, या महाराष्ट्रात आहे का? असा सवाल हे गावकरी करत आहेत. तो खऱ्या अर्थाने तितकाच पुरोगामी महाराष्ट्राला विचार करण्यास भाग पाडणारा आहे. या गावातील सुरु झालेलं हे आमरण उपोषण आणखीन किती दिवस चालेल हे आम्हाला माहीत नाही. मात्र हे आंदोलन विकासाचे दावे करणाऱ्या सर्व पक्षीय नेत्यांना चपराक म्हणावं लागेल.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT