दहावीच्या परिक्षेचे निकाल ८ मे रोजी लागले. याही वर्षी मुलींनीच बाजी मारली. पण काही विद्यार्थ्यांना परिक्षा म्हंटलं की, टेन्शन येतंच. पण यामुळे आत्महत्या हे खूप मोठं आणि चुकीचं पाऊल अनेक विद्यार्थी उचलत आहेत. पुढे आपण कोणकोणत्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात याबद्दल जाणून घेणार आहोत.
दहावीच्या निकालानंतर आनंदाचं वातावरण असतानाच धाराशिवमधून एक हृदयद्रावक घटना घडली. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं. धाराशिव जिल्ह्यातल्या भूम येथे राहणाऱ्या आदित्य नितीन जाधव या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. आदित्य हा भूममधील रवींद्र हायस्कूल येथे दहावीत शिक्षण घेत होता. नुकताच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात त्याला 63.60 टक्के गुण मिळाले होते. पण ते त्याच्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने त्याने राहत्या घरी साडीच्या मदतीने गळफास घेत आत्महत्या केली.
दहावीच्या बोर्ड परिक्षा लागण्याच्या तासभर आधी म्हणजे ८ मे २०२६ रोजी सकाळी संभाजीनगरमधील पुंडलिक येथील परिसरात एका विद्यार्थ्याने गळफास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, नापास होण्याच्या भीतीने सोहम ज्ञानेश्वर मोरे या विद्यार्थ्याने आपलं जीवन संपवलं. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दहावीच्या निकालानंतर नागपूरही हादरलं. एका विद्यार्थीनीने घरात गळफास घेतला. यासगळ्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि मित्रपरिवार आणि शाळेतही शोककळा पसरली आहे. दहावी-बारावीचा रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव वाढत असल्याचं चित्र अनेकदा समोर येतं. गुण कमी मिळाले म्हणजे आयुष्य संपत नाही, हे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. मानसिक तणावाच्या काळात मुलांशी संवाद ठेवणं आणि त्यांना भावनिक आधार देणं तितकंच महत्त्वाचं मानलं जातं.