बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण करून खून करण्यात आला. याचे पडसाद सबंध मराठवाड्यासह महाराष्ट्रात पाहायला मिळाले. या घटनेला दोन महिने पूर्ण झाले आहेत. या प्रकरणात आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी करत सत्ताधाऱ्यांकडे विरोधकांसह देशमुख कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने बीड जिल्हा हादरलं होतं. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातून जनतेच्या आलेल्या आक्रमक प्रतिक्रियांनंतर पोलिसांनी या प्रकरणातील ७ आरोपींना अटक केली. यातील खंडणी प्रकरणातील आरोपी असलेला मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड हा देखील पुण्यात पोलिसांना शरण आला. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडे सोपवण्यात आलेला आहे.
मात्र सुरुवातीला वेगाने सुरू झालेला तपास आता पुन्हा एकदा थंडावलेला बघायला मिळत आहे. या घटनेला दोन महिने पूर्ण होऊन देखील घटनेतील मुख्य मास्टर माईंड अद्यापही समोर आलेला नाही. तर कृष्णा आंधळे हा आरोपी देखील पोलिसांना अजूनही सापडलेला नाही. सध्या त्याला फरार घोषित करून त्याची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देण्याची देखील घोषणा पोलीस प्रशासनाने केली आहे. मात्र त्याच्या शोधासाठी राज्यासह इतर राज्यातही पोलिसांचे पथक पाठवून देखील कृष्णा आंधळे पोलिसांच्या हातावर तुरी देण्यास कसा यशस्वी होतो? यावरून आता तपास यंत्रणेवर शंका उपस्थित केल्या जात आहे.
यावर आता मस्साजोगच्या ग्रामस्थांसह संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याकडून कृष्णा आंधळेच्या अटकेची मागणी होत आहे. तसंच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असंही त्यांचं म्हणण आहे. यावर धनंजय देशमुख यांनी साम टीव्हीच्या प्रतिनिधी सोबत बोलताना प्रतिक्रिया देखील दिली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझं दुःख कमी होत नाही. दुःख वाढत चाललं आहे. न्यायाच्या भूमिकेत सर्वजण आहेत. मात्र माझा भाऊ कुठून येणार? त्यासाठी कोणते दार ठोठवायचे? वेदना भयानक आहे. कृष्णा आंधळे कागदोपत्री दोन महिने फरार होता. त्याला अभय दिले नसते, तर हा गुन्हा थांबला असता. त्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार कोण? हे प्रशासनाने आम्हाला सांगावे, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.
पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, याला जबाबदार कोण याचे उत्तर आम्हाला पाहिजे आहे. आरोपींना अभय मिळत गेलं म्हणून पुढच्या घटना घडत गेल्या. एसआयटी आणि सीआयडीचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. मात्र घटना घडल्यानंतर आरोपींचे मोबाईल चालू होते. कोणतेही मोबाईल ट्रेस केले नाही. ही सहजासची गोष्ट घेण्यात आली. गांभीर्याने घेण्यात आली नाही. शोध होत नाही म्हणून म्हटलं जात आहे. की तो महाराष्ट्रा बाहेर गेला? हा प्रश्न देशमुख कुटुंबाचा नाही. अभय दिल्याने मोठी घटना घडली आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे. हे कागदपत्रे देखील सिद्ध करून दाखवणार आहोत, असं धनंजय देशमुख यांनी दोन महिने पूर्ण झाल्यानंतर म्हटल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.