रत्नागिरी जिल्हा परिषदेचा विद्यार्थ्यांच्या मोबाईल अभ्यासाबाबत मोठा निर्णय
विद्यार्थ्यांना मोबाईलवर गृहपाठ देण्यास रत्नागिरीत बंदी
रत्नागिरीतील शाळांमध्ये मोबाईलवर ऑनलाइन अभ्यास देण्यास बंदी
लहान मुलांमध्ये मोबाईल वापराचे वाढतं प्रमाण हा अत्यंत चिंतेचा विषय ठरतोय. शालेय अभ्यास व शाळेच्या इतर उपक्रमांसाठी मोबाईल काही प्रमाणात उपयुक्त ठरत असला तरी मुलांना लहान वयापासून मोबाईलचं व्यसन लागतंय. काही शाळांमधून विद्यार्थ्यांना मोबाईलवर ऑनलाइन अभ्यास दिला जातो.यामुळे मुलांचा मोबाईलचा वापर वाढलाय. लहान वयातच त्यांच्यामध्ये अनेक शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होत असल्यानं रत्नागिरी जिल्हा परिषदेने शालेय विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईलवर ऑनलाईन अभ्यास देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आलीय. स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये वाढणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्या रोखणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास देण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे शिक्षकांनी अभ्यास देण्यासाठी पूर्वीचीच पारंपारिक पद्धत अवलंबावी, असा आदेश सर्व शाळांना दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांचे पाढे पाठांतर करून घेण्याची जुनी पद्धत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तसेच त्याची तपासणी थेट जिल्हा परिषद शिक्षण प्रशासनाकडून केली जाणार आहे, या बाबतचं वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिलंय.
एका मराठी वाहिनीच्या वृत्तानुसार, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र जिल्ह्यातील खासगी शाळांमध्येही या निर्णयाची सक्तीने अंमलबजावणी केली जाणार आहे. स्थायी समितीचा हा निर्णय लवकरच सर्व शाळांना लेखी स्वरूपात कळवला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या आरोग्याचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आलाय, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) वैदेही रानडे यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.
कोविडच्या काळापासून ऑनलाईन वर्ग आणि ऑनलाईन अभ्यास देण्याची पद्धत सुरू झाली. त्यानंतर कोरोनाचा कहर संपल्यानंतरही शाळा नेहमीप्रमाणे सुरू झाल्या, तरीही विद्यार्थ्यांना अभ्यास देण्यासाठी मोबाईलचा वापर सुरूच राहिला. मोबाईलवर दिल्या जाणाऱ्या या अभ्यासाबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी चिंता व्यक्त केली. मोबाईलचा अतिवापर आणि गुगल सर्चच्या सवयीमुळे अनेक विद्यार्थी आता पाठ्यपुस्तकेही उघडत नाहीत.
अभ्यास घेण्याची जुनी पद्धत लागू करत असतानाच विद्यार्थ्यांना २ ते ३० पर्यंतचे पाढे तोंडपाठ करून घेण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. पारंपारिक शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना पाढे तोंडपाठ करत. मात्र आता मोबाईल आणि कॅल्क्युलेटरच्या वापरामुळे मुले पाढे पाठ न करताच थेट उत्तरे शोधतात. यामुळे त्यांची पाठांतराची सवय मोडलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.