संदेरी गावात सापडलेली पिल्ले बिबट्याची नसून दुर्मिळ वाघाटी प्रजातीची असल्याचे स्पष्ट
व्हायरल अफवांनी निर्माण केलेली घबराट वनविभागाने कमी केली
पिल्लांना आईसोबत नैसर्गिक अधिवासात पुन्हा सोडण्याचा प्रयत्न सुरू
रायगडमध्ये अधिवास कमी होत असल्याने भविष्यात मानव–वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता
राज्यात बिबट्याचा वावर वाढला आहे. अनेक जिल्ह्यात बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे संदेरी गावातील एका बागेत बिबट्याची दोन पिल्ले आढळल्याच्या बातम्या व्हायरल होत होत्या आणि त्यामुळे परिसरात स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु बिबट्याच्या या पिल्लांचे वास्तव काही वेगळेच निघाले आहे. हि पिल्ले वाघाटी या जगातील सर्वात छोट्या मात्र संरक्षित असलेल्या वाघाटी या मांजर प्रजातीची असून बिबट्याची पिल्ले म्हणून चुकीच्या अफवा पसरत होत्या.
1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत वाघाटी मांजराला वाघा इतकेच संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या दोन पिल्लांना वन विभागातर्फे व वन्यजीव संरक्षक यांच्यातर्फे सुरक्षित ठेवण्यात आले आहे. मागील तीन दिवसांपासून या दोन नर जातीच्या पिल्लांना त्यांच्या आईकडे सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लोकांना शेतात किंवा बागेत बिबट्याचे पिल्लू सापडल्याची किंवा बिबट्या दिसल्याची अनेक प्रकरणे आहेत, पण तपासणीनंतर ते प्रत्यक्षात काही ठिकाणी जंगली मांजर असल्याचे सिद्ध होते. बिबट्याच्या भीतीमुळे लोकांमध्ये गैरसमज पसरले जातात आणि विनाकारण घबराटीचे वातावरण निर्माण होते.
म्हसळा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि प्रभारी सहाय्यक उपवनसंरक्षक संजय पांढरकामे यांच्या मार्गदर्शनात वनपाल तुळशीराम चावरेकर, वनरक्षक प्रियंका जाधव, प्रदीप कोरडे आणि सचिन चव्हाण यांनी त्वरित योग्य ती कार्यवाही करत सदरच्या वाघाटीची पिल्ले ताब्यात घेऊन, त्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे, त्यात सदरची पिल्ले तंदुरुस्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
पिल्लांना सापडलेल्या परिसरात त्यांच्या आईसोबत नैसर्गिक अधिवासात पुनर्मिलन होत असल्यास मुक्त करण्याचे किंवा मग त्यांची वाढ होईपर्यंत सुश्रुषा करून पुन्हा त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडायचे याबद्दलचा निर्णय घेऊन पुढील कार्यवाही उपवनसंरक्षक शैलेंद्रकुमार जाधव आणि प्रभारी सहाय्यक उपवनसंरक्षक संजय पांढरकामे यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.
रायगड जिल्ह्यात बिबट्या सर्वत्रच अगदी सामान्यतः आढळून येतो. परंतु महाराष्ट्रात सध्या इतर ठिकाणी जसा बिबट आणि मानव संघर्ष चालू आहे, तसा मानव वन्यजीव संघर्ष रायगड जिल्ह्यात आपल्याला सहसा पाहायला मिळत नाही. येथे वन्यजीवांना मुबलक नैसर्गिक अधिवास अजूनपर्यंत शिल्लक आहेत, परंतु दिवसेंदिवस हे नैसर्गिक अधिवास धोक्यात येत आहेत. वाढणाऱ्या मानव वसाहती, मानवाच्या वाढणाऱ्या सीमा, अनेक वर्षांपासून पडीक असलेल्या जमिनींचे सध्या खरेदी-विक्री व्यवहार होऊन तेथील अधिवास नष्ट करून लावण्यात येणाऱ्या बागायती, टेबले प्लॉट आणि फार्म हाऊस च्या नावे उध्वस्त केला जाणारा स्थानिक अधिवास. त्यामुळे रायगड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वन्यप्राण्यांचे अधिवास कमी होत चालले आहेत. अशा अनेक कारणांमुळे भविष्यात महाराष्ट्रातील इतर ठिकाणांप्रमाणेच जिल्ह्यात देखील मानव-वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात उध्दभवू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.