विकास मिरगणे
नवी मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. सर्वत्र होत असलेल्या अवकाळीमुळे प्रचंड नुकसान होत असून उन्हाळ्यात उत्पन्नाच्या दृष्टीने लागवड करण्यात आलेला भाजीपाला देखील खराब होऊ लागला आहे. यातच सलग दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ झाली असून ५० टक्क्यांनी दर वधारले आहेत. तर दुसरीकडे ग्राहक येत नसल्याने व्यापाऱ्यांचे देखील नुकसान होत आहे.
प्रामुख्याने उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक तशी कमीच असते. यामुळे उन्हाळ्यात भाजीपाल्याचे दर वाढत असतात. मात्र यंदा मे महिन्याच्या सुरवातीपासूनच अवकाळी पाऊस होत असल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. भाजीपाला देखील खराब होत असल्याने मुंबई, वाशीच्या मार्केटमध्ये भाजीपाल्याची होणारी आवक देखील कमी झाली आहे. याचा परिणाम म्हणून दरात मोठी वाढ झाली आहे.
पावसामुळे ग्राहकही येईनात
सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे वाशीतील भाजीपाला मार्केटमध्ये मालाची आवक कमी असतानाही ग्राहकांची संख्या घटली आहे. परिणामी शिल्लक भाजीपाला फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर झाला असून, अनेक भाज्यांचे दर झपाट्याने वाढले आहेत. चांगल्या प्रतीच्या भाज्यांचे दर ४० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. तर येणाऱ्या काही दिवसांतही दरवाढ कायम राहू शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. सध्या बाजारात 469 गाड्यांची आवक झाली.
असे आहेत भाजीपाल्याचे दर
- फ्लॉवर : १६ ते २६ रुपये किलो
- टोमॅटो : १८ ते २२ रुपये किलो
- वाटाणा : ८० ते १०० रुपये किलो
- फरसबी : ६० ते ९० रुपये किलो
- शेवग्याच्या शेंगा : २० ते ५५ रुपये किलो
- कोथिंबीर : १२ ते १५ रुपये जुडी
- पालक : ८ ते १० रुपये जुडी
- मेथी : १२ ते १५ रुपये जुडी
- कांदा पात : ८ ते १० रुपये जुडी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.