नंदुरबारच्या आमला गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली
नवजात मुलीच्या जन्माच्या दिवशीच दोन वर्षांच्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू
अंगणात खेळताना विषारी सापाने दंश केला
मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यात कुटुंबाने पोस्टमार्टम न करता अंत्यसंस्कार केले
शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीत अडथळे
नियती कधी कशाची आणि कशी परीक्षा घेईल याचा नेम नसतो. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील आमला गावातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका बाजूला घरात नवजात चिमुरडीच्या जन्माचा आनंद साजरा होत असताना, त्याच दिवशी दोन वर्षांच्या पोटच्या गोळ्याचा सर्पदंशानं मृत्यू झाला. एकाच वेळी घरात पाळणा आणि सरण एकत्र पाहण्याची दुर्दैवी वेळ या आदिवासी कुटुंबावर आली आहे. पण दुःखाचा डोंगर कोसळलेल्या या कुटुंबासमोर आता प्रशासकीय नियमांचा आणखी एक डोंगर उभा ठाकला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,१४ जून रोजी मंगेश पावरा यांच्या पत्नी शकुंतला पावरा यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्यांना धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळातच शकुंतला यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. घरात मुलीचे आगमन झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मंगेश आणि त्यांच्या नातेवाईकांनी या सुखद क्षणाचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली होती. मात्र, नियतीला हा आनंद बहुधा मंजूर नव्हता. मंगेश आणि त्यांची पत्नी रुग्णालयात असताना घरी त्यांचा दोन वर्षांचा मुलगा विराट आजोबा आणि नातेवाईकांसोबत होता. अंगणात खेळत असताना अचानक एका विषारी सापाने विराटला दंश केला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्याला मोटारसायकलवरून धडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला.
रुग्णालयाकडे जात असताना विराटची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. त्याला वाटेत दोनदा उलट्या झाल्या. मात्र उपचार मिळण्यापूर्वीच या चिमुकल्याने अखेरचा श्वास घेतला. ज्या रुग्णालयात एका नव्या जीवाचे स्वागत झाले होते, त्याच ठिकाणी दुसऱ्या जीवाचा अंत झाला. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यात असलेल्या कुटुंबासमोर त्यावेळी अनेक प्रश्न उभे राहिले. एका बाजूला नुकतीच बाळंत झालेली पत्नी आणि दुसऱ्या बाजूला मुलाचा मृतदेह. शवविच्छेदनासाठी बराच वेळ लागणार असल्याचे सांगितल्यानंतर गोंधळलेल्या कुटुंबाने पोस्टमार्टम न करता मुलावर अंत्यसंस्कार केले.
मात्र, हा निर्णय आता त्यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे. शासनाकडून सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास आर्थिक मदत दिली जाते. परंतु त्यासाठी शवविच्छेदन अहवाल आवश्यक असतो. विराटचे पोस्टमार्टम न झाल्याने या गरीब आदिवासी कुटुंबाला मदत मिळण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाने मानवी दृष्टिकोनातून या प्रकरणाचा विचार करून पावरा कुटुंबाला न्याय व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.