पराग ढोबळे, साम टीव्ही
नागपूर: येथील एका साध्या चप्पल बदलण्याच्या वादाचे रूपांतर रक्तरंजित थरारात होऊन १८ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना रामटेक परिसरात घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या चार तरुणांनी विटा आणि काठ्यांनी हल्ला करून समीर राजू ध्रुव या तरुणाची हत्या केली. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण समीर राजू ध्रुव (१८, रा. ढाबाडी, जि. बडोदाबाजार, छत्तीसगड) हा रामटेक तालुक्यातील सोनेघाट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चौघान परिसरातील सोना ब्रिक्स वीटभट्टीवर कामाला होता. २६ मार्च रोजी रामनवमीच्या निमित्ताने काही तरुण रामटेक येथील गडमंदिर येथे दर्शनासाठी गेले होते. मंदिराबाहेर चपला काढल्या असताना, एका तरुणाने चुकून दुसऱ्याची चप्पल घातली. या किरकोळ चुकीमुळे तरुणांमध्ये गैरसमज निर्माण झाला.
दुसऱ्या दिवशी चप्पल बदलल्याचा प्रकार लक्षात आल्यावर त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. हा वाद सुरू असतानाच रविवारी रात्री तो विकोपाला गेला. आरोपींनी दारूच्या नशेत समीरशी वाद घातला आणि संतापाच्या भरात त्याच्यावर विटा आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात समीर गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने रामटेक उपजिल्हा रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत अवघ्या काही तासांतच चारही आरोपींना अटक केली आहे. केवळ एका चप्पल बदलण्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.