मुंबई-गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात
मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण होऊन महामार्ग सुरू होण्याची शक्यता.
प्रवासाचा वेळ १२ तासांवरून ६ तासांपर्यंत कमी होणार
मुंबई आणि गोव्यामध्ये राहणाऱ्या त्याचसोबत मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. या महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. प्रसिद्ध महामार्गाच्या सुधारणांमुळे दोन्ही शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यांचा प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलून जाईल. मुंबई ते गोवा प्रवास सुसाट होईल. हा महामार्ग मार्च २०२६ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. मुंबई-गोवा महामार्ग हा पनवेल ते सिंधुदुर्ग असा ४६६ किलोमीटर लांबीचा चार पदरी महामार्ग आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधून जाणारा हा महामार्ग सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
मुंबई- गोवा महामार्गाच्या अपग्रेडेशनमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा नवीन महामार्ग कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई ते गोवा प्रवासाचा वेळ खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल. सध्या मुंबईवरून गोव्याला जाण्यासाठी १२-१३ तासांचा कालावधी लागतो. हा प्रवासाचा वेळ ६ तासांपर्यंत कमी होईल. म्हणजे तुम्ही मुंबईवरून गोव्याला फक्त ६ तासांत पोहचू शकणार आहात.
मुंबई-गोवा महामार्गावर वाहन टोल वसुलीसाठी आता अत्याधुनिक प्रणाली लागू केली जाईल. ज्यामध्ये सॅटेलाइट ट्रॅकिंग आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. ज्यामुळे आपोआप टोल कापला जाईल. ज्यामुळे प्रवासादरम्यान वाहनांना कुठल्याही टोलनाक्यावर थांबण्याची गरज राहणार नाही. महामार्ग कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई ते गोवा प्रवासात वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होईल. या महामार्गामुळे कोकणातील पर्यटन आणि व्यावसायाला गती मिळेल.
मुंबई- गोवा माहामार्ग ४६६ किलो मीटरचा आहे. मुंबई-गोवा प्रवासादरम्यान महामार्गावर ४१ बोगदे आणि २१ पूल असणार आहेत. या महामार्गावर १४ ठिकाणांहून वाहनांना प्रवेश करता येणार आहे. १४ वर्षांपूर्वी या महामार्गाच्या कामाला सुरूवात झाली होती. या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा महामार्ग कोकणात जाणारे प्रवासी आणि व्यापाऱ्यांसाठी गेम चेंजर ठरेल. यामुळे पर्यटन, व्यापार आणि स्थानक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत सांगितले की, 'मुंबई-गोवा महामार्गात अनेक अडचणी होत्या. पण काळजी करू नका आम्ही या जूनपर्यंत रस्ता १०० टक्के पूर्ण करू. भावंडांमध्ये भांडणे, न्यायालयीन खटले आणि जमिनीचा मोबदला देण्यात अनंत गुंतागुंत होती. पण आता ते प्रश्न सुटले आहेत आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे.' केंद्रीय मंत्र्यांन सांगितल्याप्रमाणे जर हा महामार्ग लवकर सुरू झाला प्रवाशांसह पर्यटकांना चांगला फायदा होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.