गणेशोत्सवानंतर मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
माणगाव आणि लोणेरे परिसरात वाहनांच्या लांबलचक रांगा
अरुंद बाजारपेठ व रखडलेला उड्डाणपूल ठरत आहेत अडथळा
पोलिसांचे प्रयत्न सुरू, पण प्रवाशांची गैरसोय कायम
गणेशोत्सवाची धामधूम संपताच कोकणातून मुंबईकडे परतीचा प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव ते तळेगाव या सात किलोमीटरच्या अंतरावर तसेच लोणेरे ते टेमपाले या सुमारे चार किलोमीटरच्या परिसरात वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून, प्रवाशांना तासन्तास ठिकठिकाणी अडकून राहावे लागत आहे. ही परिस्थिती विशेषतः दुपारनंतर गंभीर झाली असून, माणगाव बाजारपेठेची अरुंद रचना आणि लोणेरे येथील रखडलेला उड्डाणपूल हे या कोंडीमागचे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे.
गणेशोत्सव आटोपल्याने हजारो कुटुंबांनी कोकणातून मुंबई-पुण्याकडे परतीचा प्रवास सुरू केला आहे. काल रात्रीपासूनच वाहतुकीची गर्दी वाढू लागली होती, मात्र सकाळी परिस्थिती तुलनेने सामान्य होती. परंतु दुपारनंतर वाहनांचा ओघ वाढल्याने महामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी वाहतुकीचा ताण निर्माण झाला. त्यामुळे माणगाव आणि लोणेरे दरम्यान मुंबईकडे जाणारा मार्ग अक्षरशः ठप्प झाला आहे.
वाहतूक पोलिसांनी मात्र परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वाहनचालकांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही ठिकाणी वाहतूक वळविण्याचे उपायही केले जात आहेत. तरीही गणेशभक्तांचा ओघ पाहता गर्दी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, महामार्गावरील अपुऱ्या सोयीसुविधा, रखडलेले उड्डाण पूल आणि अरुंद बाजारपेठा यामुळे दरवर्षी गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात अशीच बिकट परिस्थिती निर्माण होते. प्रवाशांना लवकरच वाहतूक सुरळीत व्हावी आणि सुरक्षितपणे घरी परतता यावे, यासाठी आता स्थानिक प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.