चंद्रपूर : राज्यातील तापमानात प्रचंड वाढ होत असून सूर्यदेव जणू काही आग ओकत असल्याचा अनुभव येत आहे. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूरमध्ये झाली असून हवामान विभागाकडून चंद्रपूरमध्ये पुढील तीन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासह मराठवाडा व खानदेशातील देखील उच्चाकी तापमानाकडे वाटचाल सुरु आहे. परिणामी दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत.
गेल्या आठवड्यात वादळी वारा आणि अवकाळी पाऊस अनुभवलेल्या चंद्रपूरात ४५.६ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काल नोंदविण्यात आलेले तापमान राज्य आणि देशातच नाही; तर जगात सर्वात उच्चांकी ठरले आहे. विशेष म्हणजे पुढील तीन दिवस हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात अशाच प्रकारे तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला असून येलो अलर्ट जारी केला आहे.
रस्त्यांवर शुकशुकाट
चंद्रपुरात या तापमानामुळे अत्यावश्यक कामांसाठीच लोक बाहेर पडताना दिसत आहे. दुपारच्या दरम्यान सर्व प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तापमान एवढे आहे की, घरातील एसी आणि कुलर देखील काम करेनाशे झाले आहे. दरवर्षी तापमानाचा उच्चांक चंद्रपूर शहर गाठत आले आहे. नेमेचि येतो उन्हाळा, असे म्हणत ताप सहन करण्याशिवाय नागरिकांना पर्याय नाही. तशी मानसिकताच नागरिकांनी केलीय. त्यामुळे तापमान कितीही वाढले, तरी रहाटगाडगे चालू ठेवण्याशिवाय लोकांकडे पर्याय नाही.
विदर्भासह मराठवाडा तापला
राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. वाढत्या तापमानात अंगाची अक्षरश: लाही लाही होत आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील तापमान हे सर्वात जास्त नोंदविले जात आहे. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात देखील तापमान ४० अंशाच्या पार गेले आहे. यात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील तापमान ४३ अंशाच्या जवळपास राहत आहे. तर नाशिक जिल्ह्यात देखील पारा ४० च्या वर गेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.