राज्यात थंडीची लाट पुन्हा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गायब झालेली थंडी आता पुन्हा सुरू झाली आहे. राज्यातील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. कधी थंडीचा जोर तर कधी अवकाळी पाऊस अशी सध्य स्थिती राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. राज्यातील काही ठिकाणचे तापमान १० अंशाच्या खाली गेले आहे. पण आता राज्यात पुन्हा थंडीचा जोर कमी होऊन तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यामध्ये आणखी दोन दिवस थंडीचा जोर राहणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे प्रामुख्याने राज्याच्या उत्तर भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भातील पारा ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. पण पुढील दोन दिवसांत दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पीयुक्त वाऱ्याचा जोर वाढून राज्यात पुन्हा तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.
सध्या उत्तर भारतात दाट धुके आणि थंडीची लाट पसरली आहे. हिमालयात होत असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. काही भागात दाट धुकेही पडत आहे. सध्या विस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर पाकिस्तान भागात सक्रीय आहे. त्यामुळे उत्तरेकडील काही राज्यांमध्ये पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात आर्द्रता वाढल्याने तापमानात बदल होत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. राज्यात बहुतांश भागात येत्या २ ते ३ दिवसांत तापमान घसरणार असून ३ ते ५ अंशांनी राज्यात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. सोमवारी राज्यातील विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानही वाढले होते. अशातच आता येत्या २४ तासांत थंडीचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.