ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराने राजकारणात खळबळ
संजय राऊत यांनी कोर्ट निकालाशी संबंध जोडला
पवनराजे हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत
निष्ठा विरुद्ध सूड यावर राजकीय चर्चा रंगली
धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा ठाकरेसेना सोडण्याचा निर्णय अनेकांच्या जिव्हारी लागलाय. निष्ठावान ओमराजेंनी ठाकरेंची साथ का सोडली? खासदार संजय राऊतांनी काय खळबळजनक दावा केलाय ? पाहूयात या खास रिपोर्टमधून...
महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतर, दलबदल हे काही नवं नाही. आणि शिवसेनेला तर जन्मापासूनच पक्षफुटीचा आणि गद्दारांचा शाप. पण ज्यावेळेस निष्ठावान पक्ष सोडतात तेव्हा चर्चा तर होणारंच. सहा खासदारांमुळे ४ वर्षांनंतर शिवसेना पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर असतांना या सर्व खासदारांपेक्षा निष्ठावान असलेल्या ओमराजेंच्या पक्षांतरांची महाराष्ट्रात मोठी चर्चा सुरुये. त्यांच्यासाठी पुण्यात काल रात्री 10.30 वाजता खास चार्टड विमान आलं तानाजी सावंतांनी निंबाळकरांना पुण्याहून दिल्लीला नेण्यासाठी आखलेल्या या गोपनिय प्लॅनला लिड केलं होतं.
दिल्लीहून पुण्यात आल्यानंतर ओमराजे पुणे विमानतळावर व्हीआयपी लाऊंजमध्ये तीन तास बसून होते. त्यानंतर त्यांनी स्वत:चे वाहन टाळत त्यांनी खासगी वाहनानं दुसऱ्या मार्गानं घरी गेल्यानं त्यांच्या बंडखोरीवर शिंक्का मोर्तब झाल्याचं बोललं जातंय. पवनराजे निंबाळकरांच्या हत्येनंतर अवघ्या २२ - २३ वर्षांच्या ओमराजेंनी जिल्ह्यातील प्रस्थापित राष्ट्रवादीच्या मातब्बर पद्मसिंह पाटलांच्या विरोधात लढण्यासाठी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. तो आजतायगत...
2009 च्या निवडणूकीत शिवसेनेनं त्यांना अवघ्या 26 वर्षी आमदारकीची संधी दिली
2014 च्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटलांकडून पराभव
2019 मध्ये शिवसेनेनं लोकसभेची उमेदवारी दिली आणि ते खासदार झाले
2024 पुन्हा ठाकरेसेनेकडून लोकसभेत विजयी
शिवसेनेनं धाराशिवमध्ये ओमराजेंच्या रुपानं एक तरुण आक्रमक चेहरा दिला 2022 च्या शिवसेनेतील बंडानंतरही ओमराजेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत पक्ष निष्ठा दाखवली. त्यामुळे मातोश्रीवर ओमराजेंबद्दल कायम जिव्हाळा. त्यामुळे ठाकरेसेना सोडण्याच्या त्यांचा निर्णय सर्वांसाठी धक्कादायक ठरलाय. मात्र संजय राऊतांनी केलेल्या एका दाव्यानं खळबळ माजलीये.
2006 रोजी पवनराजेंची कळंबोलीत हत्या झाली होती या प्रकरणाचा आता २० वर्षांनी निकाल येतोय. रविवारी मातोश्रीच्या बैठकीला गैरहजर राहणारे ओमराजे मंगळवारी या निकालाच्या सुनावणीसाठी मुंबई हायकोर्टात हजर होते. परंतू अचानक हा निकाल २० जूनला ढकलला गेला. आणि त्यावरून राऊतांनी त्यांच्यावर बंडखोरीचा आरोप केलाय. निकाल ओमराजेंच्या बाजूनं लागला तर भाजप आमदार राणा जगजित सिंह यांचे वडिल पद्मसिंह पाटलांची थेट जेलमध्ये रवानगी होऊ शकते. त्यामुळे वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ओमराजे जर पक्ष सोडणार असतील तर सोशल मिडीयावरील चर्चा होणारंच...कारण आपल्या बेधडक शैलीमुळे आणि हक्काचा माणूस म्हणून मराठवाड्यातले सर्वात लोकप्रिय खासदार मानले जातात. मात्र त्यांच्या या बंडामुळे त्यांचं जोरदार ट्रोलिंग होतंय.
ओमराजे निंबाळकरांचं ट्रोलिंग केले जात आहे.
'दादा गद्दारी करु नका...हात जोडून विनंती'
'आज गद्दारी कराल तर पुन्हा गुलाल नाही लागायचा'
'गद्दारी झाली तर... पराभव निश्चित...'
'गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका'
'ओमदादा निष्ठावंत रहा गद्दार गँगमध्ये समाविष्ट होऊ नका'
मराठवाड्यात तेरणेच्या तीरावर योगासनं करतांना, अधिकाऱ्यांच्या वाढलेल्या ढेऱ्या पाहून त्यांना व्यायामाचा सल्ला देणारे, जनतेच्या कामासाठी खासगी मोबाईल नंबर जाहिर करणारे, जिल्हा बैठकीत राजकीय वैरी राणा जगजितसिंहांसोबत भांडणारे, पुरात जिवाची बाजी लावून लोकांना वाचवणारे. म्हणूनच आज त्यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा ही केवळ राजकीय घटना राहिलेली नाही, तर ती भावनिक चर्चाही बनलीये. राजकारणात पक्ष बदलणं सोपं असतं पण निष्ठेवर उभ्या राहिलेल्या प्रतिमेचं उत्तर देणं तितकंच कठीण असतं. म्हणूनच आता निष्ठा आणि सूडाच्या खेळात ओमराजेंचं राजकीय भवितव्य काय असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.