भीमा - नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल १,१४६ मि.मी., तर नीरा खोऱ्यात ३७४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून ८१ हजार ६०० क्युसेक, तर वीर धरणातून ६३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नरसिंहपूर येथील भीमा-नीरा संगमावर सुमारे दीड लाख क्युसेक पाण्याचा प्रवाह तयार होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भीमा खोऱ्यातील २० प्रमुख धरणांपैकी १६ धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. येडगाव १,०००, वडज ४,०००, डिंभे ८,५००, घोड १,५००, चिलेवाडी १,१२६, कळमोडी ३,६७४, चासकमान १९,६८०, भामा आसखेड ९,९००, वडिवळे ३,५९२, आंध्रा १,३५३, पवना ८,४००, कासार साई १,८००, मुळशी ८,८००, वरसगाव ५२००, पानशेत १८११५, खडकवासला ४३,५७१क्युसेक या धरणांतून मिळून १ लाख ५३ हजार ७११ क्युसेक पाणी भीमा व तिच्या उपनद्यांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे दौंडमार्गे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या उजनी धरणात ५२.७५ टीएमसी (९८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा, तर ११६.४० टीएमसी एकूण पाणीसाठा आहे. पूर नियंत्रणासाठी धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.सायंकाळी ६ वाजताच्या नोंदीनुसार उजनी धरणात ३२ हजार १०७ क्युसेक पाण्याची आवक होत होती. धरणातून नदीपात्रात ८० हजार क्युसेक, वीज निर्मितीसाठी १,६०० क्युसेक, उजवा कालवा २,७०० क्युसेक, दहिगाव उपसा ९० क्युसेक, सीना-माढा योजना २८० क्युसेक आणि बोगद्यातून ९०० क्युसेक असा एकूण विसर्ग सुरू आहे.
प्रशासनाने भीमा व नीरा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, जनावरे व शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा तसेच महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.