रणजित माजगावकर, कोल्हापूर|ता. ९ जुलै २०२४
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांतील नदी, नाल्यांना पूर आला असून शहरांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळित झाले आहे. एकीकडे पावसाळ्यात झालेल्या चिखलाने अनेकजण त्रस्त झाले असताना कोल्हापूरमध्ये झालेल्या चिखल महोत्सवाची सध्या राज्यभरात चर्चा आहे. काय आहे नेमकं प्रकरण? वाचा...
आजपर्यंत नाट्य महोत्सव, खाद्य महोत्सव, चित्रपट महोत्सव अनेकांनी पाहिला असेल. पण चिखल महोत्सवही असतो असं सांगितलं तर आश्चर्य वाटेल ना? पण कोल्हापूरमधील एका शाळेत चक्क चिखल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये शाळकरी मुलांनी चिखलात लोळून, उड्या मरुन हा महोत्सव दणक्यात साजरा केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील श्री शिवाजी हायस्कूल कसबा तारळे या शाळेत चक्क चिखल महोत्सव भरवण्यात आला. नवनिर्मितीची आस असणाऱ्या मातीत लहानपणी यथेच्छ खेळणारे आपण, मोठेपणी मात्र, यापासून दूर राहतो. याच मातीची महती विषद करणारा, मातीविषयी प्रेम जागृत करणारा चिखल महोत्सव अर्थात मड फेस्टिव्हलचे आयोजन या शाळेत करण्यात आले होते.
चिखलात मनसोक्त लोळणारी या मुलांना पाहण्यासाठी अनेक भागातून आलेले माजी विद्यार्थी, गावकरी उपस्थिती होते. राधानगरी तालुक्यात सध्या मस्त पाऊस कोसळतोय या पावसात झालेला हा आगळा वेगळा चिखल महोत्सव फक्त आनंदच नव्हे तर उपस्थितांना मायेची उब देऊन गेला. या महोत्सवा दरम्यान विद्यार्थ्यांना मातीमधून कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून अंगावर तसेच मातीमध्ये हळद पसरण्यात आली. गोमूत्र शिंपडण्यात आले. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही चिखल महोत्सवाचा आनंद लुटला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.