सोलापुरात ‘लाडकी बहीण’ योजनेतील एक लाखाहून अधिक महिलांची पडताळणी पूर्ण.
दहा हजार महिला दिलेल्या पत्त्यावर सापडल्या नाहीत.
विभक्त रेशनकार्ड असलेल्या सुनांना व मुलींना लाभ कायम राहणार.
चुकीचे आधार क्रमांक व खोट्या पत्त्यांमुळे योजना गोंधळात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. वयोमर्यादेबाहेरील महिला, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी आणि अर्ज करताना चुकीचा पत्ता देणाऱ्या महिलांची संख्या मोठी असल्याचे उघड झाले. त्यापैकी तब्बल दहा हजार महिला दिलेल्या पत्त्यावर सापडल्याच नाहीत. दरम्यान काही लाडक्या बहणींचा विवाह झाल्यामुळे त्यांना लग्नानंतर बदलत्या रेशन कार्डनुसार त्यांचा लाभ बंद होणार नसल्याचा प्रशासनाने म्हटलं आहे.
या योजनेसाठी पात्रतेचा स्पष्ट नियम ठरविण्यात आला होता – २१ ते ६५ वयोगटातील महिला अर्ज करू शकतात आणि एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोनच महिलांना हा लाभ मिळू शकतो. पण प्रत्यक्षात मात्र लाखो महिलांनी हे निकष डावलून अर्ज दाखल केले. अनेक कुटुंबांत तीन-तीन किंवा चार महिलांनी अर्ज भरले होते. तरीदेखील माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या पडताळणीदरम्यान असे लाभार्थी बाजूला काढले गेले.
योजनेच्या निकषानुसार विवाहित व अविवाहित अशा दोनच महिलांना लाभ मिळायला हवा होता. मात्र, अनेक महिलांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे रेशनकार्ड विभक्त झालेले असल्याने ते स्वतंत्र कुटुंबातील सदस्य मानले गेले. परिणामी त्यांचा लाभ बंद होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. म्हणजेच, विभक्त रेशनकार्ड असलेल्या सुना किंवा मुली या योजनेसाठी पात्र मानल्या जातील.
सोलापूर जिल्ह्यातील पडताळणी अहवालानुसार ८३,७२२ महिला या निकषात बसल्या, तर १४,००० महिलांची वेगवेगळी कारणांसाठी पात्रतेबाहेर टाकण्यात आले. मात्र सर्वात गंभीर बाब म्हणजे तब्बल दहा हजार महिलांचा पत्त्यावर ठावठिकाणा मिळाला नाही. या महिलांनी अर्ज करताना दिलेले पत्ते चुकीचे होते किंवा त्या प्रत्यक्ष राहात नसल्याचे आढळले. राज्यभरातील आकडेवारीनुसार अशी संख्या चार लाखांहून अधिक आहे.
दरम्यान, योजनेअंतर्गत आधारकार्ड क्रमांक चुकीचा नोंदवल्यामुळेही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनेक महिलांनी अर्ज करताना चुकीचा आधार क्रमांक टाकला. परिणामी शासनाकडून ज्या महिलांना थेट बँक खात्यात लाभ जमा व्हायला हवा होता, तो प्रत्यक्षात इतर व्यक्तींच्या खात्यात जमा होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्यांना प्रत्यक्ष लाभ द्यायचा होता, त्या महिलांना आतापर्यंत एक रुपयाही मिळाला नाही. आता तो लाभ चुकीच्या खात्यातून वसूल करून मूळ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात कसा जमा करायचा, हा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी होत असताना महिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला होता. मात्र, मोठ्या प्रमाणावर अर्ज चुकीचे भरले जाणे, चुकीचे आधार क्रमांक, खोटे पत्ते, तसेच एकाच कुटुंबातील अनेक महिलांनी अर्ज करणं यामुळे प्रशासनालाही मोठा ताण सहन करावा लागत आहे. तरीदेखील शासनाने स्पष्ट केले आहे की, पात्र महिलांचा लाभ बंद होणार नाही. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.