राज्यात अवकाळी पावसामुळे गारपीट व वादळी वारे
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट जारी
पुणे-भोर महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प
उष्णतेची लाट कमी होऊन हवामानात बदल
Maharashtra Today Temprature News राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काल महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार वारे, पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. दरम्यान, राज्यातील उष्णतेची लाट काहीशी कमी झाली असून, काल म्हणजेच बुधवारी अमरावती, वर्धा, अकोला, सोलापूर, आणि यवतमाळ येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली, तर धुळे येथे १२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
आज मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उर्वरित राज्यात ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापुर महामार्ग परिसरात काल झालेल्या गारांसह जोरदार अवकाळी पावसाने कापुरव्होळ येथे महामार्गावरील वाहतुक पूर्णतः कोलमडली. महामार्गावर हरिश्चंद्री फाटा येथे चालु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी वाहतुक वळवलेल्या सेवा रस्त्यावर तीन फुट उंच एवढे पाणी तुंबल्याने वाहतुक पुर्णपणे थांबली. सुमारे एक तास ठप्प झालेल्या या वाहतुकीने महामार्गावर चार ते पाच किलोमिटर वाहनांच्या रांगा लागल्या. कामाच्या ठिकाणी पाणी वाहुन जाण्यास योग्य नियोजन नसल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.