महाराष्ट्रातील पारंपरिक कुस्ती स्पर्धा ‘महाराष्ट्र केसरी’भोवती सध्या मोठा वाद निर्माण झाला असून, हा वाद सरकारने तातडीने सोडवावा अन्यथा राज्यभर मोठे आंदोलन उभे राहील, असा इशारा माजी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिलाय.
चंद्रहार पाटील यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातील कुस्ती स्पर्धांमधील सध्याचा वाद हा केवळ क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित नसून तो राजकीय स्वरूपाचा झाला आहे. यंदा राज्यात एकाच वेळी चार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा आयोजित केल्या जात असल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. विविध संघटना आणि आयोजकांच्या हस्तक्षेपामुळे या प्रतिष्ठित पदाचा मान कमी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या वादामुळे सर्वात मोठा फटका पैलवानांना बसत असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. 'सरकार नेमके कोणाला मान्यता देणार आणि फायदे कुणाला मिळणार, हा प्रश्न अजूनही तसाच आहे. त्यामुळे पैलवानांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यांच्या मेहनतीचं नुकसान होताना दिसतंय' असं ते म्हणाले.
आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ४५ पैलवानांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण केलं होतं. या उपोषणाद्वारे त्यांनी कुस्ती क्षेत्रातील गोंधळ थांबवण्याची मागणी केली. 'संघटनांमधील वादात पैलवान भरडला जातोय. क्रीडापटूंना राजकारणात ओढलं जात असून त्यांच्या करिअरवर याचा वाईट परिणाम होताना दिसतोय' असं पाटील यांनी स्पष्ट केलंय.
महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा म्हटलं की संपूर्ण देशात उत्सुकता पाहायला मिळते. त्यामुळे या स्पर्धेची प्रतिष्ठा टिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र सध्या 4 स्पर्धा भरल्यामुळे खेळाडूंमध्ये संभ्रम तयार होतोय.
या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील यांनी राज्य सरकारकडे स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी केली आहे. “सरकारने अधिकृत ‘महाराष्ट्र केसरी’ कोणती हे ठरवावं आणि या स्पर्धेचं आयोजन ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराप्रमाणे स्वतःच्या देखरेखीखाली करावं,” असे त्यांनी म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.