रायगडच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून असलेली शांतता मंगळवारी एकाच वेळी घडलेल्या दोन मोठ्या घडामोडींमुळे पूर्णपणे भंग झाली आहे. महायुतीमधील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर आले असून, शिंदे गटाचे आमदार तथा मंत्री भरत गोगावले यांचे मंत्रिपदाबाबतचे मोठे विधान आणि आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेला घणाघाती हल्ला यामुळे रायगडचे राजकारण चांगलेच तापले आहे.
मागील सत्ताकाळात जनतेच्या हितासाठी आणि पक्षाच्या निर्णयासाठी सलग अडीच वर्षे मंत्रिपद नाकारणारा मी एकमेव आमदार आहे, जर वरिष्ठ नेत्यांचा आदेश आला किंवा पक्षाने उद्याच राजीनामा देण्यास सांगितले, तर मी क्षणाचाही विलंब न लावता राजीनामा देण्यास तयार आहे, असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, अलिबाग येथे महसूल विभागाचा एक शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महायुतीमधील सर्वकाही अलबेल नसल्याचे उघड झाले. कार्यक्रमातील निमंत्रण पत्रिकेवरून आणि मानपानावरून राजकीय नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंचावर उपस्थित महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या गोंधळाबद्दल जाहीर माफी मागितली. कार्यक्रम संपल्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत खासदार सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका केली. खासदार सुनिल तटकरे हे महायुतीत असूनही त्यांची वागणूक वेगळी आणि स्वार्थी असल्याचा थेट आरोप दळवी यांनी केला. महायुतीतील घटक पक्षांना डावलून स्वतःचे राजकारण केले जात असल्याचा घणाघात त्यांनी तटकरेंवर केला.
अनेक दिवसांच्या शांततेनंतर रायगडमध्ये अचानक झालेल्या या घडामोडींमुळे राजकीय गोटात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. एका बाजूला गोगावले यांच्या राजीनाम्याच्या तयारीचे विधान आणि दुसऱ्या बाजूला शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात यांच्यातील हा जाहीर वाद, यामुळे रायगडमधील महायुतीचा हा कलह येत्या काळात काय वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.