Rain Update : मागील तीन- चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. प्रामुख्याने वर्धा, भंडारा व वाशीम जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजविला आहे. तर भंडारा व वर्धा जिल्ह्यात आज पावसाचे रेड अलर्ट जरी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहे. यात भंडारा जिल्ह्यातून महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याचा संपर्क देखील तुटला आहे.
वर्धा जिल्ह्यात रेड अलर्ट
वर्धा जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. दरम्यान आज जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज सकाळपासुन पावसाचा जोर वाढला असून नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. यात आर्वी तालुक्यातील शिरपूर येथे नाल्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद तर सोरटा येथील नाल्याला पूर आल्याने रस्ता बंद, हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर अलमडोह मार्ग बंद, कोसूर्ला मोठा येथे जाण्याचा मार्ग नाल्याच्या पुरामुळे बंद तर जुना बोरगाव ते नवीन बोरगाव रस्ता सुद्धा बंद झाला आहे.
बफेरा पुलावरील वाहतूक बंद, महाराष्ट्र- मध्यप्रदेशचा संपर्क तुटला
भंडारा : भंडारा जिल्ह्यात देखील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यात बावनथडी नदीवर बांधकाम करण्यात आलेल्या महाराष्ट्र- मध्यप्रदेश आंतरराज्य पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. बावनथडी नदीच्या पुराच्या पातळीत वाढ होत असल्याने सिहोरा गावाला धोका निर्माण झाला आहे. सिहोरा परिसरातून गेलेल्या भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्गाला बावनथडी नदीवरील पूल महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांना जोडतो. पुलाची उंची कमी असल्याने तीन दिवसापासून दमदार पावसामुळे बावनथडी नदीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने जिल्हा प्रशासनाने आंतरराज्य पुलावरून वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला.
गोसेखुर्द धरणाच्या विसर्गात विक्रमी वाढ
भंडारा जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन प्रभावित झालं आहे. वैनगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. तर गोसेखुर्द धरणातून विक्रमी ५ लाखांपेक्षा अधिक क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण प्रशासनाने २१ दरवाजे अडीच मीटरने, तर १२ दरवाजे दोन मीटरनं उघडले आहेत. यामुळे नदीनाले ओसंडून वाहत असल्यानं जिल्ह्यातील ८० गावांना जोडणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे.
वाशीम जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाची संततधार
वाशीम : वाशिम जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्या- नाले दुथडी भरून वाहत आहेत. विशेषतः वाशिम आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेली पैनगंगा नदी पूर्णपणे भरून वाहत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. दुसरीकडे सतत पाऊस पडत असल्यामुळे शेतात पाणी साचून पिकाचं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी पेक्षा जास्त पाऊस होत असल्याचं प्रशासनाने दिलेल्या आकडेवारी वरून स्पष्ट होतं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.